देशाचा एक्स-रे व्हावा; मग कळेल देशात OBC-दलित अन् अल्पसंख्याक..; राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:22 IST2025-04-09T18:21:45+5:302025-04-09T18:22:07+5:30
अहमदाबादमध्ये काँग्रेस अधिवेशनातून राहुल गांधींनी दलित, मागासवर्गीय, आदिवासी, आरएसएस, अदानी-अंबानीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

देशाचा एक्स-रे व्हावा; मग कळेल देशात OBC-दलित अन् अल्पसंख्याक..; राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi AICC : गुजरातमधील अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या काठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पक्षाच्या प्रमुखांसह देशभरातील सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधींनी दलित, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, आरक्षण, आरएसएस, अदानी-अंबानी, बांग्लादेश आणि ट्रम्प टॅरिफ मुद्द्यावर भाष्य केले.
जातीय जनगणनेच्या मागणीचा पुनरुच्चार
राहुल गांधी म्हणतात, 'आपण देशाचा एक्स-रे करुन पाहिला पाहिजे, जेणेकरुन देश खरोखरच दलित, गरीब, मागासलेल्यांचा आदर करतो का, हे समजेल. तेलंगणामध्ये आम्ही जात जनगणनेचे क्रांतिकारी पाऊल उचलले. आम्ही संसदेत जातीय जनगणनेची मागणी केली होती, पण मोदीजी आणि आरएसएसने स्पष्टपणे नकार दिला. मी फक्त जातीय जनगणनेची मागणी केली, ज्याद्वारे मला जाणून घ्यायचे होते की, या देशात देशात कोणाचा सहभाग किती आहे.'
LIVE: Nyaypath - AICC Session | Ahmedabad, Gujarat https://t.co/8snXJNmtEM
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 9, 2025
तेलंगणामध्ये 90% ओबीसी
'तेलंगणातील 90% लोकसंख्या ओबीसी, अत्यंत मागासवर्गीय, दलित, अत्यंत दुर्लक्षित दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींची आहे. जर तुम्ही तेलंगणातील कॉर्पोरेट क्षेत्राकडे पाहिले, मालक, सीईओ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाची यादी पाहिली, या 90 टक्के लोकसंख्येपैकी एकही व्यक्ती सापडणार नाही. तेलंगणाच्या कॉर्पोरेट क्षेत्रात या 90 टक्के क्षेत्राचा सहभाग जवळजवळ नाही. मला आनंद आहे की, जातीच्या जनगणनेनंतर तेलंगणातील आमच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षण 42 टक्क्यांपर्यंत वाढवले.'
राहुल पुढे म्हणतात, 'पंतप्रधान मोदी 24 तास मागासवर्गीयांबद्दल बोलतात. पण जेव्हा सहभागाचा प्रश्न येतो, तेव्हा भाजपचे लोक गप्प बसतात. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर 50% आरक्षणाची भिंत तोडू, जात जनगणना करू.' राहुल गांधी यांनी अमेरिकन टॅरिफबाबतही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'ट्रम्प यांनी नवीन शुल्क लादणार असल्याचे सांगितले होते. मोदी सरकारने यावर काहीही केले नाही. संसदेत हे नाट्य दोन दिवस चालले. देशावर गंभीर आर्थिक संकटे येणार आहेत पण नरेंद्र मोदी गप्प आहेत,' अशी टीकाही त्यांनी केली.
आम्ही ब्रिटिशांविरुद्ध अन् आरएसएसविरुद्ध लढलो...
'आपण स्वातंत्र्यासाठी फक्त ब्रिटिशांशी लढलो नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्धही लढलो. संघाची विचारसरणी ही स्वातंत्र्यलढ्याची विचारसरणी नाही. रामलीला मैदानात आरएसएसने हे संविधान जाळले होते. या संविधानात लिहिले आहे की आपला ध्वज तिरंगा असेल. आरएसएसने या तिरंग्यालाही सलाम केला नाही. हे लोक लोकशाही संपवू इच्छितात. हे सरकार सर्व पैसे अदानी-अंबानींना देऊ इच्छिते. मी एससी/एसटी उपयोजनेचा मुद्दा उपस्थित केला होता.
आम्ही एक क्रांतिकारी कायदा आणला होता, पण भाजपने हा कायदा रद्द केला. भाजप देशातील सर्व संस्थांवर एक-एक करून हल्ला करत आहे. जिथे जिथे दलित, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरीब सामान्य वर्गातील लोकांना स्थान मिळत होते, तिथे भाजपने सर्व ठिकाणांचे दरवाजे बंद केले आहेत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.