आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 09:37 IST2025-06-01T09:34:59+5:302025-06-01T09:37:48+5:30
अल्जेरियात भारतीय समुदायाला संबोधित करताना ओवेसींनी पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कवर कठोर शब्दांत टीका केली.

आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले...
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांचा जगभरात पर्दाफाश करण्यासाठी एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे ३३ देशांमध्ये पाठवण्यात आली असून, एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा त्यात समावेश आहे. अल्जेरियात भारतीय समुदायाला संबोधित करताना ओवेसींनी पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कवर कठोर शब्दांत टीका केली.
झकीउर रहमान लखवी प्रकरणावरून पाकिस्तानचा पर्दाफाश
ओवेसींनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर झकीउर रहमान लखवीच्या प्रकरणाचा उल्लेख करत पाकिस्तानवर दुटप्पीपणा दाखवण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “कोणताही देश दहशतवादाच्या आरोपाखालील व्यक्तीला तुरुंगात सजा भोगत असताना विशेष वागणूक देत नाही. मात्र, पाकिस्तानमध्ये लखवी तुरुंगात असूनही बाप बनतो, हे कायद्या आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन नाही का?”
ग्रे लिस्टचा प्रभाव आणि ओवेसींचा इशारा
पाकिस्तानला पुन्हा एकदा FATF (Financial Action Task Force) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडताना ओवेसी म्हणाले की, “२०१८ साली जेव्हा पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये होता, तेव्हा भारतात दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली होती. पुन्हा तसेच केल्यास परिणामकारक फरक पडेल.”
त्यांनी दहशतवादाच्या जागतिक स्वरूपावर भाष्य करत सांगितले की, “हा केवळ दक्षिण आशियाचा प्रश्न नाही. आपण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. त्यामुळे भारतात दहशतवाद वाढल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होतील. जागतिक शांततेसाठी पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.”
#WATCH | Algiers, Algeria | AIMIM chief and MP Asaduddin Owaisi says, "There was this one terrorist called Zakiur Rehman Lakhvi - no country in the world would allow a terrorist who's facing a terror charge. He became a father to a son while sitting in prison. The trial… pic.twitter.com/Gd5whrzW13
— ANI (@ANI) May 31, 2025
दहशतवाद दोन गोष्टींवर अवलंबून
दहशतवादाच्या मुळाशी जात ओवेसी म्हणाले, “दहशतवाद दोन गोष्टींवर अवलंबून असतो – विचारसरणी आणि निधी. पाकिस्तानी दहशतवादी गटांची विचारसरणी दाएश आणि अल-कायदाशी मिळतीजुळती आहे. त्यांना वाटते की त्यांच्या हिंसक कृत्यांना धार्मिक आधार आहे, जे पूर्णतः चुकीचे आहे.”
ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांना बसला फटका
७ मे २०२५ रोजी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रित केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांचे १०० हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ड्रोन व गोळीबाराच्या माध्यमातून प्रहार केला, मात्र भारताने ११ पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करत प्रभावी प्रत्युत्तर दिले.