कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर पण 'या' ठिकाणी फक्त 35 रुपये किलो, खरेदीसाठी आहे अट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 01:51 PM2020-10-25T13:51:01+5:302020-10-25T14:08:54+5:30

Onion News : गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे दर वाढतच आहेत. मात्र तेलंगणामध्ये 35 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. मात्र कांदे खरेदी करण्यासाठी दुकानदाराला ओळखपत्र दाखवणं गरजेचं आहे. 

telangana government to sell onion at rs 35 per kg in hyderabad | कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर पण 'या' ठिकाणी फक्त 35 रुपये किलो, खरेदीसाठी आहे अट

कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर पण 'या' ठिकाणी फक्त 35 रुपये किलो, खरेदीसाठी आहे अट

Next

गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा आता शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यापाठोपाठ बटाट्यानेही उच्चांक गाठला आहे. कोरोनाने अगोदरच खिशाला कात्री लावलेली असताना कांदा, बटाट्याच्या वाढलेल्या दराने कंबरडे मोडले असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे दर वाढतच आहेत. मात्र तेलंगणामध्ये 35 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. मात्र कांदे खरेदी करण्यासाठी दुकानदाराला ओळखपत्र दाखवणं गरजेचं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये 35 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. मात्र एका व्यक्तीला फक्त 2 किलो कांदे दिले जात आहेत. तेलंगणा राज्यातील सरकार सर्वसामान्यांना स्वस्त कांदे देत आहे. हैदराबादमधील रायतू मार्केटमध्ये 35 रुपये दराने कांदा मिळत आहे. रायतू बाजारात छोटे शेतकरी भाजीपाला थेट ग्राहकांना विकू शकतात. तेलंगणा सरकारने शनिवारी शेतकरी बाजारातून कांदा 35 रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अतिवृष्टीमुळे खरिपाच्या कांद्याचे झालेले अतोनात नुकसान तर,दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला होत असलेली वाढती मागणी त्यातच लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे सर्वत्र उपहारगृहे, खानावळी सुरु झाल्याने सध्या कांद्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात नविन कांद्याचा हंगाम सुरू होतो. मात्र यावर्षी सततचा पावसाबरोबरच परतीच्या मुसळधारेचा फटका कांद्याला बसल्यामुळे यंदा नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. 

बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असून डिसेंबर नंतरच नविन कांद्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे .तोपर्यंत चांगल्या प्रतिच्या जुन्या कांद्याचे भाव वाढतच राहणार असून ही दरवाढ आणखीन महिनाभर तरी टिकून राहील असे जाणकार व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा कांद्याच्या उत्पादनाचे समीकरण विस्कटले आहे. साठवण केलेला उन्हाळी कांदा लॉकडाऊनच्या काळात सुरूवातीला माती मोल दरात विकणाऱ्या कांदा उत्पादकांना गत महिन्यापासून बाजारात चांगल्या दराने विकण्याची वेळ आली असता,केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली. याच साठवण केलेल्या कांद्यातील 70 टक्के कांदा वातावरण बदल तसेच पावसामुळे सडला. उवर्रीत कांद्यावर वर्षभराचे गणित जमवणाऱ्या कांदा उत्पादकांचे गणित निर्यात बंदी मुळे विस्कटलेले आहे. अतिवृष्टी मुळे पावसाळ्यात लावलेली कांद्याची रोपे देखील तगू शकली नाही.परिणामी कमी उत्पादन आणि जास्त मागणी यामुळे काही काळ कांदा भाव खाणारच असे चित्र आहे.


 

Web Title: telangana government to sell onion at rs 35 per kg in hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.