९५ माकडांना विषारी अन्न खायला दिले; १५ जणांचा मृत्यू, ८० जणांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:59 IST2026-01-22T12:59:33+5:302026-01-22T12:59:50+5:30
या घटनेमुळे पशुप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

९५ माकडांना विषारी अन्न खायला दिले; १५ जणांचा मृत्यू, ८० जणांची प्रकृती गंभीर
Telangana Crime: तेलंगानातील कामारेड्डी जिल्ह्यातून मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील अंतमपल्ली गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका ढाब्यावर अनेक माकडांना विष देऊन मारण्यात आले. या घटनेत किमान १५ माकडांचामृत्यू झाला असून सुमारे ८० माकडे गंभीर अवस्थेत आढळून आली आहेत.
नेमकं काय घडलं?
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ गावचे सरपंच आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवले. पथकाने घटनास्थळी दाखल होऊन आजारी माकडांवर तातडीने उपचार सुरू केले. वेळेत मदत मिळाल्यामुळे अनेक माकडांचे प्राण वाचवण्यात यश आले.
८० माकडांची प्रकृती चिंताजनक
स्थानिकांच्या माहितीनुसार, जवळपास ८० माकडे अत्यंत नाजूक अवस्थेत आढळून आली. त्यांना चालणे-फिरणेही कठीण होत होते. मृत माकडांचे मृतदेह ढाब्याच्या परिसरात विखुरलेले आढळले. अज्ञात व्यक्तींनी जाणूनबुजून विषारी पदार्थ खाऊ घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीही विषबाधेचे प्रकार
या घटनेमुळे पशुप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, कामारेड्डी जिल्ह्यातील मचारेड्डी आणि बिक्कनूर मंडळांमध्ये अलीकडेच माकडे आणि भटकी कुत्री यांना विष दिल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे ही घटना अधिकच चिंताजनक मानली जात आहे.
सरपंचांचा आरोप, तक्रार दाखल होणार
गावचे सरपंच महेंद्र रेड्डी यांनी सांगितले की, काही अज्ञात लोकांनी माकडांचा एक समूह व्हॅनमधून आणून राष्ट्रीय महामार्गावरील त्या ढाब्याजवळ सोडल्याचा संशय आहे. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार आहे.
उपचार सुरू, तपास चालू
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाचवण्यात आलेल्या माकडांवर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ प्रशासन किंवा पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.