४४० व्होल्टचा झटका! लाखोंचं बिल पाहून चहावाल्याला हार्ट अटॅक; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:48 IST2026-03-19T11:42:04+5:302026-03-19T11:48:24+5:30
वीज विभागाचा हलगर्जीपणा आणि आलेल्या भल्या मोठ्या बिलाने एका गरीब वृद्धाचा बळी घेतला आहे.

४४० व्होल्टचा झटका! लाखोंचं बिल पाहून चहावाल्याला हार्ट अटॅक; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वीज विभागाचा हलगर्जीपणा आणि आलेल्या भल्या मोठ्या बिलाने एका गरीब वृद्धाचा बळी घेतला आहे. भरथना पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या महावीर नगर परिसरात ही घटना घडली आहे. येथे राहणारे शिवपाल सिंह कश्यप हे टपरीवर चहा विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे, अचानक खूप जास्त बिल आल्यामुळे त्यांना धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवपाल सिंह यांच्या घरी लावलेल्या स्मार्ट मीटरचं केवळ दोन महिन्यांचं बिल सुमारे ८० हजार रुपये आले होते. इतकी मोठी रक्कम पाहून ते प्रचंड अस्वस्थ झाले आणि बिल दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अनेकदा वीज विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र प्रत्येक वेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठवण्यात आलं आणि त्यांच्या समस्येचे निराकरण केलं गेलं नाही असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
प्रकरण इथेच थांबलं नाही. तिसऱ्या महिन्यात जेव्हा नवीन वीज बिल आलं, तेव्हा ती रक्कम वाढून सुमारे १ लाख ४० हजार रुपये झाली होती. इतकी मोठी रक्कम पाहून शिवपाल सिंह पूर्णपणे खचून गेले. सततचा मानसिक ताण आणि आर्थिक दबावामुळे त्यांना हार्ट अटॅक आला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घेऊन भरथना वीज केंद्र गाठलं आणि तिथेच निदर्शने सुरू केली. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस, तहसीलदार आणि वीज विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तीन तास प्रशासकीय अधिकारी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. याप्रकरणी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली असून त्याची चौकशी केली जात आहे. जुन्या मीटरच्या रीडिंगचीही तपासणी केली जाईल आणि जे काही तथ्य समोर येईल, त्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.