भीती ठरली जीवघेणी! कुत्रा चावल्याचं पालकांपासून लपवलं; १५ वर्षांच्या मुलाचा रेबीजमुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:57 IST2026-01-21T14:56:24+5:302026-01-21T14:57:16+5:30
भटका कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लागण झालेल्या १५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भीती ठरली जीवघेणी! कुत्रा चावल्याचं पालकांपासून लपवलं; १५ वर्षांच्या मुलाचा रेबीजमुळे मृत्यू
तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भटका कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लागण झालेल्या १५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पालकांना घाबरून मुलाने कुत्रा चावल्याचं सांगितलं नाही. ही माहिती लपवणं या निष्पाप मुलाच्या जीवावर बेतलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून संताप व्यक्त केला जात आहे.
तामिळनाडूमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कांचीपुरम जिल्ह्यातील वालाजाबाद जवळील चिन्नीवाक्कम गावातील भास्कर यांचा १५ वर्षीय मुलगा सबरीवासन स्थानिक सरकारी शाळेत नववीत शिकत होता. महिन्याभरापूर्वी घराबाहेर मित्रांसोबत खेळत असताना एक पिसाळलेला कुत्रा त्याला चावला होता.
पालकांच्या भीतीपोटी मुलाने सत्य लपवलं
जर आपण कुत्रा चावल्याचं घरी सांगितलं तर आई-वडील आपल्याला मारतील किंवा ओरडतील या भीतीने सबरीवासनने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याच्या वागण्यात अचानक बदल होऊ लागला. हे पाहून वडील भास्कर यांनी त्याला तातडीने कांचीपुरम सरकारी रुग्णालयात दाखल केलं.
उपचारादरम्यान मृत्यू
तपासणीत असं समोर आलं क रेबीजचा संसर्ग त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचला होता आणि त्याची प्रकृती खालावली होती. सबरीवासनची अवस्था अत्यंत वाईट झाली होती आणि तो कुत्र्यासारखं वर्तन करू लागला होता. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी चेंगलपट्टू सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर चेन्नईतील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असतानाच सबरीवासनचा मृत्यू झाला. एका लहान मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. केवळ पालकांच्या भीतीने त्याने ही गंभीर बाब लपवून ठेवली आणि शेवटी त्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.