जितक्या वेळा पीएम मोदी तमिळनाडूत येतील, तितक्याच मोठ्या फरकाने त्यांचा पराभव होईल- एमके स्टालिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:16 IST2026-02-25T15:13:58+5:302026-02-25T15:16:23+5:30
Tamil Nadu News: आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तमिळनाडूतील राजकीय वातावरण तापले असून, DMK आणि NDA यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.

जितक्या वेळा पीएम मोदी तमिळनाडूत येतील, तितक्याच मोठ्या फरकाने त्यांचा पराभव होईल- एमके स्टालिन
Tamil Nadu News: तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान केवळ निवडणुकीच्या काळातच मतदारांचा पाठिंबा मागण्यासाठी राज्यात येतात, असा आरोप करत स्टालिन यांनी म्हटले की, मोदींचे तमिळनाडूतील वाढते दौरे, हे NDA च्या वाढत्या पराभवाचेच संकेत आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही तुमचे भविष्य माझ्यावर विश्वासाने सोपवले आहे. त्या विश्वासावर खरे उतरायला मी माझ्या क्षमतेपेक्षा अधिक मेहनत घेतोय. मी सर्वांसाठी काम करतो, काहीजण फक्त निवडणुकीपुरते येतात, असा टोला स्टालिन यांनी लगावला.
NDA च्या पराभवाचा फरक वाढणार
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या वारंवार तमिळनाडू दौऱ्यावर टीका करताना स्टालिन म्हणाले की, निवडणूक आली की पंतप्रधान येथे येतात. त्यांच्यासोबत युतीतील नेतेही येतात. पण पंतप्रधान जितक्या वेळा तमिळनाडूत येतील, NDA तितक्याच मोठ्या फरकाने येथे पराभूत होईल.
तमिळनाडू दिल्लीमधून नाही, चेन्नईतून चालेल
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अलीकडील निर्णयांचा उल्लेख करत स्टालिन यांनी केंद्र सरकारवर दुजाभावाचा आरोप केला. ते म्हणाले की, गुजरातसाठी मेट्रो रेल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली, मात्र तमिळनाडूच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. अर्थसंकल्पातही राज्यासाठी काहीच देण्यात आले नाही. तमिळनाडूवर दिल्लीमधून नव्हे, तर फोर्ट सेंट जॉर्ज (चेन्नई) येथूनच चालेल, असे स्टालिन यांनी ठामपणे सांगितले.
येणारी निवडणूक ठरवेल दिशा
मुख्यमंत्री स्टालिन पुढे म्हणाले, या सर्व बाबींवर आगामी निवडणूकच अंतिम निर्णय देईल. ज्या राज्यांमध्ये भाजप सत्तेत नाही, तिथे विकास होऊ दिला जात नाही. BJP तमिळनाडूला दबावाखाली ठेवण्याचा आणि कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण विकसित राज्यांच्या यादीत भाजपशासित राज्ये क्वचितच दिसतात. आमचे सरकार ‘द्रविडियन मॉडेल’ अंतर्गत सामाजिक सलोखा जपण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.