ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:05 IST2026-04-06T11:04:30+5:302026-04-06T11:05:17+5:30
Tamil Nadu Assembly Election 2026: यावेळच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये एक अजब बाब दिसून आली आहे. ती म्हणजे यावेळी तामिळनाडूमधील सत्ताधारी डीएमके आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमकेसह एकाही प्रमुख पक्षाने एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही.

ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?
तामिळनाडू विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. राज्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीत सत्ताधारी डीएमकेच्या नेतृत्वातील आघाडी आणि एआयएडीएमके पक्षाच्या नेतृत्वाखालील प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी यांच्यात मुख्य लढत होत आहे. तर अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षानेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने यावेळी तामिळनाडूमधील विधानसभेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये एक अजब बाब दिसून आली आहे. ती म्हणजे यावेळी तामिळनाडूमधील सत्ताधारी डीएमके आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमकेसह एकाही प्रमुख पक्षाने एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांबाबत समोर येत असलेल्या माहितीनुसार गेल्या ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यातील एकाही प्रमुख पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. ब्राह्मण व्यक्तींना उमेदवारी न देणाऱ्या पक्षांमध्ये सत्ताधारी डीएमके, डीएमकेचा मित्रपक्ष काँग्रेस, मुख्य विरोधी पक्ष असलेला एआयएडीएमके आणि भाजपाचा समावेश आहे. मात्र पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या विजय याच्या पक्षाने दोन ब्राह्मण व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. तर इतर काही छोट्या पक्षांनीही काही ब्राह्मण व्यक्तींनी उमेदवारी दिली आहे.
तामिळनाडूमध्ये एकाही प्रमुख राजकीय पक्षाने ब्राह्मण व्यक्तींना उमेदवारी न देण्यामागे काही राजकीय आणि सामाजित कारणं असल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये ब्राह्मण समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ३ टक्के एवढी आहे. त्यामुळे येथील राजकीय पक्षांची समीकरणे ही राजकीय दृष्ट्या प्रभावी आणि लोकसंख्येच्या दृष्टीने व्यापक असलेल्या समाजांच्या आसपास फिरत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे एकेकाळी ब्राह्मण समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनाधार असलेल्या एआयएडीएमके पक्षानेही एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. त्याशिवाय तामिळनाडून एआयएडीएमकेसोबत युती करून केवळ २७ जागांवर लढत असलेल्या भाजपानेही एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही.
एआयएडीएमके पक्षाने २०२१ च्या विधानसभा निवडणुकीवेळी एआयएडीएमके पक्षाने माजी पोलीस महासंचालक आर. नटराज यांच्या रूपात एकमेव ब्राह्मण चेहऱ्याला उमेदवारी दिली होती. मात्र यावेळी एआयएडीएमकेने एकाही ब्राह्मण व्यक्तीला निवडणूक लढण्याची संधी दिलेली नाही. तामिळानाडूमधील ब्राह्मण समाज हा भाजपाकडे वळत असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाही भाजपाने एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी जाहीर केलेली नाही.