'स्त्रीधना'वर फक्त पत्नीचाच हक्क, पतीचा अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 07:50 IST2026-04-02T07:50:32+5:302026-04-02T07:50:32+5:30
पत्नी आणि तिच्या नातेवाइकांना जारी केलेले समन आणि फौजदारी खटला रद्द करण्याचे आदेश

'स्त्रीधना'वर फक्त पत्नीचाच हक्क, पतीचा अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा निकाल
प्रयागराज : विवाहित महिला आपल्या 'स्त्रीधना'ची (लग्नाच्या वेळी मिळालेली मालमत्ता) एकमेव आणि पूर्ण मालक असते. तिने स्वतःचे दागिने किंवा पैसे स्वतःबरोबर नेल्यास, तिच्यावर विश्वासघाताचा किंवा चोरीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायमूर्ती चवन प्रकाश यांनी अनामिका तिवारी आणि अन्य चार जणांनी दाखल केलेली याचिका मंजूर करताना खालच्या न्यायालयाने पत्नी आणि तिच्या नातेवाइकांना जारी केलेले समन आणि फौजदारी खटला रद्द करण्याचे आदेश दिले.
काय आहे नेमके प्रकरण?
याचिकाकर्त्या महिलेचा विवाह एप्रिल २०१२ मध्ये झाला होता. लग्नानंतर तिने पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून पतीने असा आरोप केला की, सप्टेंबर २०१८ मध्ये त्याची पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांनी घरात घुसून ६,४०० रुपये रोख, दीड लाख रुपयांचे दागिने आणि घरगुती सामान नेले.
निकालातील महत्त्वाचे मुद्दे
अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे की, पत्नी ही तिच्या 'स्त्रीधना'ची पूर्ण आणि एकमेव मालक असते. लग्नाच्या वेळी मिळालेली कोणतीही मालमत्ता हे केवळ स्त्रीधन असते आणि ती पती-पत्नीची संयुक्त मालमत्ता मानली जाऊ शकत नाही. २ पत्नीला तिच्या इच्छेनुसार या मालमत्ता वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर एखाद्या संकटकाळात पतीने या मालमत्तेचा वापर केला, तरीही ती मालमत्ता पत्नीचीच राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पत्नीने स्वतःचे दागिने किंवा स्त्रीधन स्वतः सोबत नेल्यास, तिच्यावर विश्वासघाताचा किंवा चोरीचा कोणताही फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, कारण ती स्वतःच त्या मालमत्तेची कायदेशीर मालक असते.