युद्ध परिणामांवरील उपायांसाठी विशेष गट; काळाबाजार, साठेबाजांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 08:58 IST2026-03-25T08:57:29+5:302026-03-25T08:58:25+5:30
या युद्धावर लोकसभेत व त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत निवेदन केले.

युद्ध परिणामांवरील उपायांसाठी विशेष गट; काळाबाजार, साठेबाजांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धाच्या संभाव्य दीर्घकालीन परिणामांचा मुकाबला करण्यासाठी सात विशेष गटांची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत मंगळवारी केली. या संकटकाळी राज्यांनी केंद्रासोबत ‘टीम इंडिया’ अशा संघभावनेने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या युद्धावर त्यांनी सोमवारी लोकसभेत व त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत निवेदन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना काळातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी त्यावेळी स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या गटांनी मोठी मदत केली होती. त्याचप्रमाणे आता पश्चिम आशियातील युद्धाचे परिणाम हाताळण्यासाठी व त्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता तज्ज्ञांचे सात गट स्थापन करण्यात येतील.
‘काळाबाजार, साठेबाजांवर कारवाई’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात तसेच काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे राज्यांना सांगितले आहे. गॅस व कच्चे तेल मिळविण्यासाठी केंद्र सरकार सर्व स्रोतांचा वापर करत आहे. खतांचाही पुरेसा पुरवठा होण्याची तयारी केली आहे, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.