काश्मीरमध्ये बर्फवृष्टी थांबली; विमानसेवेला सुरळीत सुरुवात, रात्रीचे तापमान अजूनही शून्याखालीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 07:25 IST2026-01-25T07:24:59+5:302026-01-25T07:25:59+5:30
Kashmir Weather Update : काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु, शनिवारी या स्थितीत सुधारणा होऊन श्रीनगर विमानतळावरून हवाई सेवा सुरळीत सुरू झाली. मात्र, बहुतांश भागांत तापमान शून्याच्या खालीच नोंदवले गेले.

काश्मीरमध्ये बर्फवृष्टी थांबली; विमानसेवेला सुरळीत सुरुवात, रात्रीचे तापमान अजूनही शून्याखालीच
श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु, शनिवारी या स्थितीत सुधारणा होऊन श्रीनगर विमानतळावरून हवाई सेवा सुरळीत सुरू झाली. मात्र, बहुतांश भागांत तापमान शून्याच्या खालीच नोंदवले गेले.
'आयएमडी'नुसार रविवारपर्यंत काश्मीरच्या पर्वतीय भागांत हलका पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर, सोमवारपासून आणखी एका पश्चिमी विक्षोभाच्या परिणामाने पुन्हा वातावरणात मोठा बदल होईल. यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत अनेक भागांत हलका पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गुलमर्गमध्ये तापमान उणे १२ अंशांवर असून गांदरबलमध्ये उणे १०.५ अंश तापमानाची शुक्रवारी रात्री नोंद झाली. उर्वरित भागांत तापमान उणे ८ ते उणे ४ अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले. इकडे उत्तरकाशी व चामोलीतही थांबून-थांबून हलकी बर्फवृष्टी सुरू असून उत्तरेतील पाच राज्यांत हलका पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, बर्फवृष्टीमुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे दिल्ली, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशात पाऊस सुरू आहे.
दिल्लीत थंडीचा कडाका
दिल्लीत शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी कडाक्याची थंडी होती. तापमान १४ ते ७ अंशांदरम्यान होते. बहुतांश भागांत दाट धुके होते. तर, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक शनिवारी सकाळी २५६ वर होता.
उत्तरेत थंडी कायम
राजस्थानात थंडीची लाट कायम असून भरतपूरसह काही भागांत हलका पाऊस झाल्याने थंडीचा कडाका अधिक वाढला आहे. काही भागांत गारा पडल्या आहेत. पंजाब, हरयाणातही थंडी प्रचंड वाढली असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये पारा ५ ते १० अंशांवर होता.
एअर इंडियाने न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी सर्व विमाने केली रद्द
मुंबई : अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर २५ आणि २६ जानेवारी रोजी येथे जाणारी सर्व विमाने एअर इंडियाने रद्द केली आहेत. त्यामुळे न्यूयॉर्क, नेवार्क, न्यूजर्सी तसेच त्या परिसरातील अन्य विमानतळावर एअर इंडियाची विमाने उड्डाण करणार नाहीत. थंडीचा फटका किमान १५ राज्यांना बसला असून तेथे विमानसेवा चालवणे शक्य नसल्याने उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा कंपनीने सोशल मीडियाद्वारे केली. ज्या प्रवाशांनी तेथील राज्यांसाठी विमानांचे तिकीट काढले आहे, त्यांनी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन देखील कंपनीने केले आहे.