Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:50 IST2025-09-13T15:50:02+5:302025-09-13T15:50:40+5:30
Aishanya Dwivedi : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या शुभम द्विवेदीची पत्नी ऐशान्या द्विवेदीनेही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून भाजपा आणि बीसीसीआय विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक क्रिकेटपटूही या सामन्याला विरोध करत आहेत. आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या शुभम द्विवेदीची पत्नी ऐशान्या द्विवेदीनेही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ऐशान्या म्हणाली की, "पाकिस्तान या सामन्यातून मिळालेले पैसे दहशतवाद्यांवर खर्च करेल, जे पुन्हा आपल्यावर हल्ला करतील. आपण पाकिस्तानला ही संधी का देत आहोत?"
"बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना स्वीकारायला नको होता. मला वाटतं की, बीसीसीआय त्या २६ कुटुंबांबद्दल भावनिक नाही. पहलगाममधील नुकसान आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर ते विसरले आहेत. मी आपल्या क्रिकेटपटूंना विचारू इच्छिते की ते असं का करत आहेत? ते पाकिस्तान संघासोबत खेळण्यास का तयार आहेत? असे म्हटले जाते की क्रिकेटपटू देशभक्त असतात."
#WATCH | Kanpur, UP: On upcoming India vs Pakistan match in Asia Cup 2025, Aishanya Dwivedi - wife of Pahalgam terror attack victim Shubham Dwivedi, says, "BCCI should not have accepted a match between India and Pakistan...I think BCCI is not sentimental towards those 26… pic.twitter.com/1tAu9wjqSo
— ANI (@ANI) September 13, 2025
"पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा"
"देशभक्तीच्या या भावनेमुळेच राष्ट्रीय खेळ हॉकीपेक्षा जास्त लोक क्रिकेट पाहण्यास आणि खेळण्यास आवडतात. परंतु १-२ क्रिकेटपटू वगळता कोणीही पुढे येऊन म्हणालं नाही की, आपण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा. बीसीसीआय त्यांना बंदुकीच्या धाकावर खेळण्यास भाग पाडू शकत नाही. त्यांनी देशासाठी उभं राहिलं पाहिजे. परंतु ते तसं करत नाहीत. मी सामन्याच्या प्रायोजकांना आणि प्रसारकांना विचारू इच्छिते की, त्यांचं त्या २६ कुटुंबांबद्दल काही कर्तव्य नाही का?" असं ऐशान्याने म्हटलं आहे.
"पैसे द्याल आणि पुन्हा आमच्यावर हल्ला"
"पाकिस्तानमध्ये सामन्यातून मिळवलेल्या पैशाचा काय उपयोग होईल? पाकिस्तान त्याचा वापर फक्त दहशतवादासाठी करेल यात शंका नाही. तो एक दहशतवादी देश आहे. तुम्ही त्यांना पैसे द्याल आणि ते पुन्हा आमच्यावर हल्ला करण्यासाठी त्याचा वापर करतील. मला हे समजतं, पण लोकांना हे समजत नाही. म्हणूनच मी लोकांना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करते. तो पाहण्यासाठी जाऊ नका आणि त्यासाठी तुमचा टीव्ही चालू करू नका."
"माझा मुद्दा बीसीसीआयपर्यंत पोहोचला नाही"
"पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने म्हटलं होतं की आम्ही पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत कोणताही क्रिकेट सामना खेळणार नाही. आम्ही त्यांच्या भूमीवर सामना खेळायला जाणार नाही आणि त्यांच्या खेळाडूंना आमच्या भूमीवर पाऊल ठेवू देणार नाही. पण बीसीसीआयने यावरही मार्ग काढला. आशिया कप २०२५ चा हा सामना दुबईमध्ये नियोजित आहे. असंही म्हटलं जात आहे की भारत थेट पाकिस्तानशी खेळत नाही. भारत आशिया कपमध्ये खेळत आहे. मी बीसीसीआयला पाकिस्तानशी हा सामना न खेळण्याचं आवाहनही केलं होतं. पण मला वाटतं की माझा मुद्दा बीसीसीआयपर्यंत पोहोचला नाही" असं म्हणत ऐशान्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.