रंग दाखविले! मेट्रो स्टेशनांचे काम तुर्कीच्या कंपनीला दिले; स्थानिक कंत्राटदारांनी पूर्ण करताच कंपनी पळाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:51 IST2025-05-27T10:46:55+5:302025-05-27T10:51:20+5:30
India vs Turkey Pakistan: तुर्कीच्या कंपन्यांकडे देशातील विमानतळांची सुरक्षा, मेट्रोची सुरक्षा, सॉफ्टवेअर आदी जबाबदारी सोपविण्यात आली होती. एवढेच नाही तर ज्या मेट्रोचा एवढा गाजावाजा केला जातो, त्या मेट्रोच्या स्टेशन उभारणीची कामेही तुर्कीचीच कंपनी करते.

रंग दाखविले! मेट्रो स्टेशनांचे काम तुर्कीच्या कंपनीला दिले; स्थानिक कंत्राटदारांनी पूर्ण करताच कंपनी पळाली...
तुर्की किती विश्वासघातकी आहे हे त्यांनी याच महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धात सिद्ध केले आहे. याच तुर्कीच्या कंपन्यांकडे देशातील विमानतळांची सुरक्षा, मेट्रोची सुरक्षा, सॉफ्टवेअर आदी जबाबदारी सोपविण्यात आली होती. एवढेच नाही तर ज्या मेट्रोचा एवढा गाजावाजा केला जातो, त्या मेट्रोच्या स्टेशन उभारणीची कामेही तुर्कीचीच कंपनी करते. कानपूरमध्ये असाच प्रकार घडला असून काम पूर्ण झाल्यावर कंपनी टाळे ठोकून फुर्र झाली आहे.
ऑपरेशन सिंदूरची धग अखेर तुर्कीपर्यंत पोहोचलीच! एअरलाईन्सची हवाच उतरली, पाकिस्तानला साथ दिली अन्...
झाले असे की कानपूर मेट्रोच्या तीन मार्गांवरील विस्ताराचे काम सुरु आहे. यासाठी चुन्नीगंज, बडा चौराहा आणि नवीन मार्केटसह चार स्टेशनचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. २०२१ मध्ये याचे कंत्राट तुर्कीची कंपनी गुलरकर्मव भारतीय सहयोगी कंपनी सेम इंडियाला मिळाले होते. या कंपन्यांनी हे काम स्थानिक कंत्राटदारांना दिले होते. त्यांच्याकडून काम पूर्ण करून घेतले आणि कामाचे पैसे न देता कंपनीने कार्यालयाला टाळे ठोकून पलायन केले आहे.
या मेट्रो स्थानकांच्या कामासाठी ४० कंत्राटदारांना कामे देण्यात आली होती. या कंत्राटदारांचे ५५ कोटी रुपये या कंपनीने थकविले आहेत. मार्चपासून कंपनीने कंत्राटदारांना पैसे देणे थांबविले होते. परंतू, काम करण्याचा दबाव टाकत नंतर पैसे देण्याचे सांगितले जात होते. कंपनीचे कर्मचारी लवकर पैसे देण्याचे आश्वासन देऊन काम पूर्ण करण्यासाठी दबाव आणत होते असा आरोप करत हे कंत्राटदार आता अतिरिक्त शहर दंडाधिकारी अशोक कुमार गुप्ता यांच्याकडे गेले आहेत. त्यांनी निवेदन सादर केले आणि कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
जेव्हा सर्व कामे पूर्ण झाली तेव्हा कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर पैसे देण्यासाठी दबाव आणला, परंतू कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून पलायन केल्याचा आरोप या कंत्राटदारांनी केला आहे.