संसदेतूनच लोकांच्या समस्येचं समाधान, लोकमत सोहळ्यात शरद पवारांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 20:16 IST2019-12-10T20:13:36+5:302019-12-10T20:16:07+5:30

संसदेच्या दोन्ही सभागृहातून देशभरातील लोकांच्या समस्येवर समाधान मिळविण्यात येते.

Sharad Pawar's opinion in the Lokmat ceremony, the solution to the problems of the people through Parliament | संसदेतूनच लोकांच्या समस्येचं समाधान, लोकमत सोहळ्यात शरद पवारांचं मत

संसदेतूनच लोकांच्या समस्येचं समाधान, लोकमत सोहळ्यात शरद पवारांचं मत

नवी दिल्ली - लोकमत पार्लिमेंटरी अवॉर्डसाठी ज्या खासदारांची नावे पुढे आली होती, सर्वच खासदार त्यांच्या कामात उत्कृष्ट आहेत. त्यामुळे, या सर्वांपैकी एकाची निवड करणे आमच्यासाठी कठीण काम होते. मात्र, आमच्या निवड समितीने कसोशीने ते काम पूर्ण केले, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि लोकमत पार्लिमेंटरी अवॉर्ड निवड समितीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.  

संसदेच्या दोन्ही सभागृहातून देशभरातील लोकांच्या समस्येवर समाधान मिळविण्यात येते. आपल्या राज्याची आणि देशाची सेवा करण्याचं काम या सभागृहातून केलं जातं. देशाच्या या सभागृहाला मोठा इतिहास असून अनेक दिग्गजांनी येथूनच देशाची सेवा केली आहे. सभागृहात उपराष्ट्रपती आणि लोकसभेचे अध्यक्ष यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून दोन्ही पदावरील काम अतिशय कठीण असते, असेही पवार यांनी म्हटले. संसदेच्या सभागृहातील सदस्यांचा सन्मान करण्याचं काम लोकमतने केले, त्याबद्दल लोकमतचे अभिनंदन करतो. लोकमतचे संस्थापक ज्यांना आम्ही बाबूजी म्हणायचो, त्यांनी आमच्यासोबत महाराष्ट्र सरकारमध्ये काम केलंय. ते स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळे, इतर उद्योगांपेक्षाही त्यांचं सर्वाधिक लक्ष हे लोकमत वृत्तपत्राकडेच असायचं. हे वर्तमानपत्र सर्वात चांगलं चाललं पाहिजे, हे वर्तमानपत्र लोकांच्या समस्येचं प्रतिक झालं पाहिजे, यासाठीच त्यांनी काम केल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. बाबूजींच्या या प्रयत्नामुळेच आज हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील लोकांसाठी लोकमत हे महत्त्वाचे साधन बनले आहे, असेही पवार यांनी म्हटले.

लोकमत पार्लिमेंटरी अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार सर्वोत्कृष्ट खासदारांना सन्मानित करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या विजेत्यांची निवड केली. जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खासदार, सर्वोत्कृष्ट महिला खासदार, संसदेत पहिल्यांदा निवडून आलेली सर्वोत्कृष्ट महिला खासदार अशा चार श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात. 

पुरस्कार सोहळ्याआधी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या भीम सभागृहात ‘राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात काँग्रेसचे खासदार शशी थरूर, असदुद्दीन ओवैसी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले असून, त्यांनी मतप्रदर्शन केलं आहे. 2017 पासून या पुरस्कारांची सुरुवात झाली असून, 2018 मध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एन. के. प्रेमचंद्रन, निशिकांत दुबे, सुष्मिता देव, रमादेवी, मीनाक्षी लेखी, हेमामालिनी यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पहिल्या वर्षी शरद पवार, सीताराम येचुरी, गुलाम नबी आझाद, जया बच्चन, कनिमोळी, रजनी पाटील, छाया वर्मा या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्यात ग्रामपंचायत, विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही आता पुरस्काराने गौरविले जाते.

लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कृत खासदार

सर्वोत्कृष्ट खासदार (राज्यसभा)- तिरुची शिवा (द्रमुक)
सर्वोत्तम खासदार (लोकसभा)- सौगत रॉय
सर्वोत्कृष्ट महिला खासदार (लोकसभा)- सुप्रिया सुळे
सर्वोत्कृष्ट महिला खासदार (राज्यसभा)- विप्लव ठाकूर
सर्वोत्कृष्ट (नवागत) महिला खासदार (राज्यसभा)- कहकशां परवीन
सर्वोत्कृष्ट (नवागत) महिला खासदार (लोकसभा)- डॉ. भारती पवार

Web Title: Sharad Pawar's opinion in the Lokmat ceremony, the solution to the problems of the people through Parliament