पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 09:34 IST2026-01-14T09:34:34+5:302026-01-14T09:34:52+5:30
Seva Teerth PMO News Marathi: सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या या संकुलाला आधी 'एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह' म्हटले जात होते. मात्र, सरकारने आता याचे नामकरण 'सेवा तीर्थ' असे केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
नवी दिल्ली: भारताच्या सत्ताकारणाचे केंद्र असलेल्या पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) पत्ता आता ७८ वर्षांनंतर बदलणार आहे. दक्षिण दिल्लीतील ऐतिहासिक 'साऊथ ब्लॉक'मधून पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे कार्यालय आता सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 'सेवा तीर्थ' या आधुनिक संकुलात स्थलांतरित होत आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर, म्हणजेच १४ जानेवारी २०२६ पासून पंतप्रधान या नवीन कार्यालयातून कामाला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या या संकुलाला आधी 'एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह' म्हटले जात होते. मात्र, सरकारने आता याचे नामकरण 'सेवा तीर्थ' असे केले आहे. यापुढे सेवा तीर्थ १, सेक्रेटिरिएट कॉम्प्लेक्स, दिल्ली असा पत्ता लिहावा लागणार आहे. या संकुलात एकूण तीन मुख्य इमारती आहेत:
सेवा तीर्थ १: येथे पंतप्रधानांचे मुख्य कार्यालय (PMO) असेल.
सेवा तीर्थ २: येथे कॅबिनेट सचिवालयाचे कामकाज चालेल (हे आधीच स्थलांतरित झाले आहे).
सेवा तीर्थ ३: येथे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे कार्यालय असेल.
आधुनिक सुविधा आणि भारतीय संस्कृतीचा संगम जवळपास १,१८९ कोटी रुपये खर्चून उभारलेले हे संकुल २.२६ लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळात पसरलेले आहे. नवीन पीएमओमध्ये 'ओपन फ्लोअर मॉडेल'चा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे कामाच्या संस्कृतीत पारदर्शकता आणि वेग येईल. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी येथे हाय-टेक खोल्या आहेत, ज्यांच्या सजावटीत भारतीय संस्कृती आणि परंपरेची झलक पाहायला मिळते.
साऊथ ब्लॉकचे काय होणार?
पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थमध्ये हलवल्यानंतर, ऐतिहासिक साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकचे रूपांतर एका भव्य संग्रहालयात केले जाणार आहे. 'युगे युगीन भारत संग्रहालय' असे या संग्रहालयाचे नाव असेल, जिथे भारताचा ५,००० वर्षांचा इतिहास जगासमोर मांडला जाईल.