Satya Pal Malik: “गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार, आवाज उठवला म्हणून मला हटवलं”: सत्यपाल मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 09:03 AM2021-10-26T09:03:02+5:302021-10-26T09:06:18+5:30
Satya Pal Malik: जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात झाल्यानंतर मलिक यांची २०१९ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हाेती.
![satyapal malik alleged goa bjp pramod sawant govt corruption and fail to handle corona situation | Satya Pal Malik: “गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार, आवाज उठवला म्हणून मला हटवलं”: सत्यपाल मलिक satyapal malik alleged goa bjp pramod sawant govt corruption and fail to handle corona situation | Satya Pal Malik: “गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार, आवाज उठवला म्हणून मला हटवलं”: सत्यपाल मलिक](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/pramod-s-and-satyapal_202110711006.jpg)
Satya Pal Malik: “गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार, आवाज उठवला म्हणून मला हटवलं”: सत्यपाल मलिक
नवी दिल्ली: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी गोव्यातील भाजप सरकारवर मोठे गंभीर आरोप केले आहेत. गोव्यातील प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारने कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही. या वक्तव्यावर ही ठाम आहे, असे सांगत गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार होत असून, यासंदर्भात आवाज उठवल्यामुळेच मला तेथून हटवण्यात आले, असा गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात झाल्यानंतर मलिक यांची २०१९ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हाेती. सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारबाबत केलेले गंभीर दावे आणि आरोपांनंतर एकच खळबळ उडाली असल्याचे सांगितले जात आहे.
गोव्यातील भाजप सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरले असून, यावर मी ठाम आहे. गोवा सरकारने जे काही केले, त्यात मोठा भ्रष्टाचार होता. गोवा सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेच मला राज्यपाल पदावरून हटवण्यात आले. मात्र, मी लोहियावादी आहे. चरण सिह यांचा सहवास मला लाभला आहे. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन करणार नाही, अशी ठाम भूमिका सत्यपाल सिंह यांनी मांडली.
पंतप्रधान मोदींना याबाबत दिली माहिती
गोवा सरकारने राबवलेली घर-घर रेशन ही योजना अव्यवहारी होती. एका कंपनीच्या सांगण्यावरून ही योजना राबवली गेली होती. या कंपनीने सरकारला पैसेही दिले. काँग्रेस नेत्यांसह अनेकांनी याबाबत चौकशी करण्याची विनंती मला केली होती. त्यानुसार चौकशी केली आणि त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली, असेही मलिक यांनी सांगितले. तसेच कोरोना काळात गोव्यातील दाबोळी विमानतळाजवळ असलेल्या खाणीतील काम बंद करण्याचा सल्ला सरकारला दिला होता. मात्र, सरकारने ऐकले नाही आणि नंतर तोच परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला, असा दावा मलिक यांनी केला आहे. देशातील लोकं आजही सत्य बोलायला घाबरतात, असे मलिक यांनी म्हटले आहे. ते टीव्ही टुडेशी बोलत होते.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव आणि मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने केंद्र सरकारची गाेची झाली आहे. मलिक यांना राम माधव आणि मुंबईतील एका कंपनीच्या सूचनेनुसार ३०० काेटी रुपयांची लाच देऊ केल्याचा आराेप हाेत आहे. मात्र, या प्रकरणाच्या चाैकशीचे आदेश कसे द्यावे, अशा कात्रीत सरकार अडकले आहे. मलिक यांनी दाेन वर्षांनी हे प्रकरण उकरून का काढले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राम माधव हे त्यावेळी भाजपचे सरचिटणीस आणि जम्मू आणि काश्मीरचे प्रभारी हाेते.