तेलंगाणा काँग्रेसमध्ये बंडाचे वारे, १० आमदारांची गुप्त बैठक, सरकार संकटात? CM रेवंत रेड्डी अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 14:18 IST2025-02-02T14:17:56+5:302025-02-02T14:18:58+5:30
Telangana Congress News: काँग्रेसची स्वबळावर सत्ता असलेल्या तेलंगाणामध्ये पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाच्या १० आमदारांनी बंद खोलीमध्ये बैठक घेतली आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

तेलंगाणा काँग्रेसमध्ये बंडाचे वारे, १० आमदारांची गुप्त बैठक, सरकार संकटात? CM रेवंत रेड्डी अलर्ट
काँग्रेसची स्वबळावर सत्ता असलेल्या तेलंगाणामध्ये पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाच्या १० आमदारांनी बंद खोलीमध्ये बैठक घेतली आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तसे पक्षातील आमदारांमध्ये वाढत असलेला असंतोष शमवण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सरकारमधील सर्व मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. दरम्यान, पक्षातील काही आमदार हे मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्याबाबत नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत सहभाग घेण्यासाठी आपला दौरा रद्द केला आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना या बैठकीत सहभागी न होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पक्षामधील असंतोष अधिकच गंभीर पातळीवर पोहोचल्याचं बोललं जात आहे. या नाराजीमुळे आगामी विधान परिषद निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी चिंता पक्ष नेतृत्वाला लागली आहे.
तेलंगाणामधील काँग्रेसच्या १० आमदारांनी आमदार अनिरुद्ध रेड्डी यांच्या फार्महाऊसमध्ये गुप्त बैठक घेतली. त्यामुळे पक्षामध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीत सहभागी झालेल्या आमदारांमध्ये नैनी राजेंदर रेड्डी, भूपती रेड्डी, येनम श्रीनिवास रेड्डी, मुरली नाईक, कुचुकुल्ला राजेश रेड्डी, संजीव रेड्डी, अनिरुद्ध रेड्डी, लक्ष्मीकांत, दोंती माधव रेड्डी आणि बीरला इलैय्या यांचा समावेश होता. काँग्रेसच्या काही आमदारांनी गुप्त बैठकीनंतर अंतकलहाच्या चर्चा लपवण्याचा प्रयत्न करताना नागरकर्नूलचे खासदार मल्लू रवी यांनी सांगितले की, ही केवळ डिनर मिटिंग होती. विरोधी पक्षांनी विनाकारण हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न केला, असा दावाही त्यांनी केला.
नवी दिल्लीमध्ये प्रसासमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसच्या आमदारांची ही बैठक कुठल्याही फार्म हाऊसमध्ये नाही तर आयटीसी कोहिनूरमध्ये झाली होती. तसेच या बैठकीत १० आमदार सहभागी होणार होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ८ जणच सहभागी झाले. काँग्रेसचे खासदार मल्लू रवी यांनी सांगितले की, मी सर्व आमदारांसोबत वैयक्तिकरीत्या चर्चा केली आहे. तसेच पक्षामध्ये कुठलेही बंड होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.