हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:02 IST2025-06-21T14:02:01+5:302025-06-21T14:02:28+5:30
Air India After Plane Crash : या विमानांत असे अनेक प्रवासी होते, ज्यांना दुसरे विमान पकडून पुढे जायचे होते. परंतू, एअर इंडियाच्या सावळ्या गोंधळामुळे या प्रवाशांचेही हाल झाले आहेत.

हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
टाटाच्या ताब्यात जाताच एअर इंडिया सुधारेल अशी अपेक्षा सरकारलाच नाही तर जनतेलाही होती. परंतू, आता दोन-तीन वर्षे होत आली तरी काही केल्या एअर इंडिया सुधरायचे नाव घेताना दिसत नाहीय. अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएने एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना हटविण्याचे आदेश दिलेले असताना आता निष्काळजीपणाचा कहर करणारे वृत्त येत आहे.
एअर इंडियाची दोन विमाने वेगवेगळ्या विमानतळांवरून बिहारची राजधानी पटनाला लगेज न घेताच आली आहेत. एअर इंडियाने कारणही हास्यास्पद दिले आहे. एकाच दिवशी असा प्रकार एकाच विमानतळासाठी घडल्याने विमानतळावर उतरताच प्रवाशांचा गोंधळ सुरु झाला. यावेळी एअर इंडियाने पटना विमानतळाची धावपट्टी लहान आहे आणि पाऊस पडत होता. त्यामुळे जड सामान येऊ शकले नाही, असे कारण दिले आहे.
त्याहून कहर म्हणजे आज एअर इंडियाचे कोणतेही विमान पटनाला येणार नाहीय. उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत हे सामान पटनाला पोहोचेल असेही सांगण्यात आले आहे. म्हणजे ज्या प्रवाशांची पटनामध्ये सोय नाही त्या प्रवाशांना घरी न जाता पटन्यातच सामानाची वाट पाहत थांबावे लागणार आहे. बंगळुरूवरून आलेल्या IX2936 या विमानाने १८० प्रवाशांचे साहित्य बंगळुरुलाच ठेवले आहे. फक्त प्रवाशांना आणून विमानतळावर सोडले आहे. तसेच चेन्नईवरून आलेल्या XI1634 या विमानाने देखील प्रवाशांचे साहित्य मागेच ठेवले आहे.
वजन जास्त झाले म्हणून प्रवाशांच्या बॅगा आणल्या नाहीत, असे कारण एअर इंडियाने दिले आहे. प्रवासी विमानतळावर उतरताच लगेजची वाट पाहत होते. परंतू ते आलेच नाही. यामुळे गोंधळ सुरु झाला. यावेळी एअर इंडियाने प्रवाशांना तुमचे लगेजच आणलेले नाही असे सांगितले. प्रवासी वाद घालू लागल्यानंतर एअर इंडियाने सामान प्रवाशांच्या थेट घरी पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे.
या विमानांत असे अनेक प्रवासी होते, ज्यांना दुसरे विमान पकडून पुढे जायचे होते. परंतू, एअर इंडियाच्या सावळ्या गोंधळामुळे या प्रवाशांचेही हाल झाले आहेत.