ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, मागच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी घरं कोसळली असून, पूरस्थितीमुळे बहुतांश भाग पाण्याखाली घेला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मान्सून लवकर आल्याने नुकसान झाले आहे.
आसाममध्ये मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील लखीमपूर जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुवाहाटीमध्ये पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात तीन मुलांचा समावेश आहे. बोंडा परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला.
तर अरुणाचल प्रदेशणध्ये दोन कुटुंबांमधील सात जणांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. भूस्खलनामुळे त्यांची कार रस्त्यावरून वाहून गेली. हा अपघात पूर्व कामेंग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ वर घडला. सेप्पा येथे जात असताना अचानक भूस्खलन झाले आणि त्यात त्यांची कार वाहून गेली आणि दरीत कोसळली. तर लोअर सुबनसिरी जिल्ह्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला.
मेघालयमध्ये मागच्या २४ तासांत भूस्खलन, बुडल्यामुळे आणि वीज कोसळल्यामुळे ३ मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. तर नागालँडमधील चुमौकेदिमा जिल्ह्यात भूस्खलनामुळे कडा कोसळून रस्त्यावरून जात असलेल्या डंपरला आदळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिझोराममध्ये मागच्या २४ तासांत सह जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात म्यानमारच्या तीन नागरिकांचा समावेश आहे.
हवामान खात्याने पुढच्या २४ तासांमध्ये पूर्वोत्तर भारतातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी होईल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र बहुतांश लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत पुढील परिस्थितीचा सामना करण्याची तयारी केली आहे.