भारतीय रेल्वे जगात किफायतशीर, प्रत्येक प्रवाशाला ४५ टक्के सवलत; ७ बुलेट ट्रेन प्रकल्प योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:19 IST2026-03-19T12:15:42+5:302026-03-19T12:19:36+5:30
Indian Railway: भारतीय रेल्वेचा प्रवास वेगवान आणि प्रवाशांना परवडणारा आहे.

भारतीय रेल्वे जगात किफायतशीर, प्रत्येक प्रवाशाला ४५ टक्के सवलत; ७ बुलेट ट्रेन प्रकल्प योजना
Indian Railway: मालवाहतुकीतही लक्षणीय वाढ झाली आहे. आता २०१३-१४ मधील १,०५५ दशलक्ष टनांवरून अंदाजे १,६५० दशलक्ष टनांपर्यंत वाढ झाली आहे. यानंतर आता भारतीय रेल्वे जगातील दुसरी सर्वांत मोठी मालवाहतूक करणारी संस्था बनली आहे. रेल्वेचे विद्युतीकरण वेगाने वाढले असून, आता अंदाजे ४७,००० किलोमीटरचा रेल्वेमार्ग विद्युतीकृत झाला आहे, म्हणजेच ९९ टक्क्यांहून अधिक ट्रेन विजेवर धावतात, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
रेल्वेमार्गाच्या बांधकामालाही गती मिळाली आहे. पूर्वी सुमारे १५,००० किलोमीटर रेल्वेमार्ग बांधण्यात आला होता, पण आता तो वाढून जवळपास ३५,००० किलोमीटर झाला आहे. रेल्वेने सुरक्षेच्या बाबतीतही लक्षणीय प्रगती केली आहे. पुलांची आणि अंडरग्राउंड मार्गाची संख्या सुमारे ४,००० वरून १४,००० पर्यंत वाढली आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणेची व्याप्ती १,५०० किलोमीटरवरून ४,००० किलोमीटरपेक्षा जास्त झाली आहे, असेही ते म्हणाले.
प्रवाशांना परवडणारा प्रवास करणे शक्य
केंद्र सरकारकडून मुंबईच्या लोकलसाठी ३ हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. ज्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना परवडणारा प्रवास करणे शक्य होते. प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी मुंबईकरिता २३८ नवीन, पूर्णपणे स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकलची निर्मिती केली जात आहे. मुंबई आणि पुणे यासह ४८ शहरांमध्ये प्रवासी क्षमता वाढवण्याची कामे प्रगतीपथावर आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक प्रवाशाला ४५ टक्के सवलत
भारतीय रेल्वेला केंद्राकडून ६० हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जात आहे. म्हणजेच, प्रत्येक प्रवाशाला सुमारे ४५ टक्के सवलत मिळते. यामुळे भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात किफायतशीर वाहतुकीच्या साधनांपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचा प्रवास वेगवान आणि प्रवाशांना परवडणारा आहे. इतर वाहतूक सुविधेच्या तुलनेत भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, देशातील पहिला मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू आहे. तर, देशात सात बुलेट ट्रेन प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे. ‘स्थानक पुनर्विकास कार्यक्रमा’अंतर्गत १,३०० स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. यापैकी १८० स्थानकांचे काम पूर्ण झाले. तर, ५०० स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि उर्वरित स्थानकांवरील काम वेगाने सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.