राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडणार होते; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 11:03 IST2023-02-13T11:02:28+5:302023-02-13T11:03:01+5:30

काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांचा खुलासा

Rahul Gandhi to leave Bharat Jodo Yatra; But..., Say venugopal doot | राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडणार होते; पण...

राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडणार होते; पण...

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचीभारत जोडो यात्रा यशस्वीपणे संपली आहे; परंतु, या यात्रेबद्दल सांगताना काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी खुलासा केला की, सुरुवातीला हे फार सोपे नव्हते, कारण यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केरळमध्ये यात्रा असताना राहुल गांधींना गुडघ्यात तीव्र वेदना होत होत्या. वेदना इतकी तीव्र होती की राहुल गांधींनी त्यांच्याशिवाय प्रवास सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.  

वेणुगोपाल म्हणाले की, राहुल गांधींच्या गुडघेदुखीची माहिती मिळताच प्रियांका गांधी यांचाही फोन आला. इतर ज्येष्ठ नेत्यांकडे प्रचाराची धुरा सोपवण्याचा त्यांनी विचार केला; पण राहुल गांधींशिवाय या प्रवासाची कल्पनाही होऊ शकत नाही. त्यानंतर राहुल गांधींनी शिफारस केलेले फिजिओथेरपिस्ट भेटीला गेले. त्यांनी त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांचा त्रास हळूहळू बरा झाला. केरळमधील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्वत: राहुल गांधी यांनी गुडघ्याच्या समस्येबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते की, जेव्हा जेव्हा त्यांना कठीण जाते तेव्हा ते पक्ष कार्यकर्ते आणि जनतेचा आधार घेतात.

भारत जोडो यात्रेने ७५ जिल्हे, १२ राज्ये आणि दाेन केंद्रशासित प्रदेशांमध्ये १४६ दिवसांत ४,००० किलोमीटरहून अधिक अंतर कापले. यात्रेतील थांबे वगळता राहुल गांधी दररोज पायी चालत होते. यामध्ये तामिळनाडूची कन्याकुमारी ते केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, यूपी, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू- काश्मीर या राज्यांचा समावेश आहे.

Web Title: Rahul Gandhi to leave Bharat Jodo Yatra; But..., Say venugopal doot