14 दिवसांच्या बाळानं गमावली वडिलांची सावली; तिलक राज यांच्या हौतात्म्याची मन हेलावणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 16:21 IST2019-02-15T15:58:18+5:302019-02-15T16:21:32+5:30

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामध्ये जवान तिलक राज हे शहीद झाले आहेत.

pulwama terror attack soldier who martyred in attack had became father 14 days back | 14 दिवसांच्या बाळानं गमावली वडिलांची सावली; तिलक राज यांच्या हौतात्म्याची मन हेलावणारी कहाणी

14 दिवसांच्या बाळानं गमावली वडिलांची सावली; तिलक राज यांच्या हौतात्म्याची मन हेलावणारी कहाणी

ठळक मुद्देतिलक राज यांच्या पत्नी सावित्री देवी यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे. घरामध्ये मुलाच्या बारशाची तयारी सुरू असतानाच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले आहेत.तिलक राज आपल्या मुलाचा जन्मानंतर 11 फेब्रुवारी रोजी कामावर रुजू झाले होते.

शाहपूर -  जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामध्ये जवान तिलक राज हे शहीद झाले आहेत. तिलक राज यांच्या पत्नी सावित्री देवी यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे. घरामध्ये मुलाच्या बारशाची तयारी सुरू असतानाच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले आहेत. तिलक राज शहीद झाल्याचे वृत्त मिळताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. 

तिलक राज आपल्या मुलाचा जन्मानंतर 11 फेब्रुवारी रोजी कामावर रुजू झाले होते. मुलगा झाल्याने त्यांच्या घरात बारशाची जोरदार तयारी सुरू झाली होती. मात्र घरात ही तयारी सुरु असतानाच पुलवामा दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.



शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळले आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे जवान रतन ठाकूर हे देखील शहीद झाले आहेत. भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिलं आहे अशी प्रतिक्रिया रतन ठाकूर यांच्या वडिलांनी या हल्ल्यानंतर  दिली आहे.  ‘भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिलं आहे. माझ्या दुसऱ्या मुलालाही मी सीमारेषेवर पाठवणार आहे. माझा दुसरा मुलगाही भारतमातेसाठी देण्यास तयार आहे, पण पाकिस्तानला योग्य उत्तर दिलं गेलं पाहिजे’ असे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी रतन ठाकूर यांच्या वडिलांनी केली आहे.


पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. ''पुलवामाच्या हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे आणि याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. यासाठी भारतीय सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानला खडसावले आहे. पुलवामामध्ये गुरुवारी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा काँग्रेसने पक्षाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (15 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेस पक्ष शहीद जवानांचे कुटुंबीय, सुरक्षा दल आणि सरकारसोबत असल्याचे यावेळेस राहुल गांधींनी सांगितले. देशाच्या आत्म्यावर हल्ला झाला असून, ही वेळ राजकारण करण्याची नाहीय. आम्ही सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारसोबत आहोत, असेही त्यांनी म्हटले. 


दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. तर, मोदीजी पुन्हा एक सर्जिकल स्ट्राईक हवाय, अशी मागणीही अनेकजण करत आहेत.  जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावार पाकिस्तान पुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल. संपूर्ण भारताला हादरवून टाकणाऱ्या या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी जे काही करावे लागेल ते निश्चितच केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समस्त भारतीयांना दिली. हा पाकिस्तान आश्रित आणि पुरस्कृत हल्ला आहे. अशा दहशतवादी हल्ल्याने शांततेला सुरुंग लावू पाहणाऱ्यांचा डाव कणखरपणे उधळून लावण्यात सरकार कटीबद्ध आहे, अशी हमी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीयांना दिली.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारीलाच गुप्तचर संस्थांकडून पुलवामा IED हल्ल्या होण्यासंदर्भात अ‍ॅलर्ट जारी केला होता. यासाठी योग्य ती सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले होते. परिसराची योग्य रितीने तपासणी केल्याशिवाय जवानांचा ताफा पुढील मार्गाच्या दिशेने जाऊ देऊ नका, अशी स्पष्ट सूचना गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली होती. पण, दुर्दैवानं या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जारी करण्यात आलेल्या पत्रकात 9 फेब्रुवारीचा दिवस सर्वांधिक धोकादायक असल्याचाही इशारा देण्यात आला होता. विशेषतः पहाटेच्या सुमारास हल्ला होईल, अशी सूचना जारी करण्यात आली होती. पण बर्फवृष्टी आणि दुरुस्तीच्या कामांमुळे गेले चार दिवस हा राजमार्ग बंद ठेवण्यात आला होता.  दरम्यान, हा मार्ग सुरू झाल्यावर नेहमीच्या तुलनेत जास्त वाहने आणि जवान पाठविण्यात आले. मार्ग मोकळा केल्यानंतर 14 फेब्रुवारीला सीआरपीएफचे जवान 70हून अधिक वाहनांमधून पुलवामा येथे जम्मूहून श्रीनगरच्या दिशेने प्रवास करताना दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. 





Web Title: pulwama terror attack soldier who martyred in attack had became father 14 days back