मध्य पूर्वेतील युद्धातच भारताविरोधात कोण आखतंय डाव?; राजनाथ सिंह यांनी दिला कठोर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:15 IST2026-04-02T16:12:46+5:302026-04-02T16:15:55+5:30
राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची प्रशंसा केली आणि मोदींनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या कौशल्याने भारताच्या हिताचे रक्षण करत असल्याचे म्हटले

मध्य पूर्वेतील युद्धातच भारताविरोधात कोण आखतंय डाव?; राजनाथ सिंह यांनी दिला कठोर इशारा
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात भारताचा एक शेजारील देश चुकीचं कृत्य करू शकतो. परंतु जर असे काही झाले भारताची प्रतिक्रिया अत्यंत कठोर आणि निर्णायक असेल. ऑपरेशन सिंदूर अद्यापही जारी आहे अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त केरळ दौऱ्यावर आलेल्या राजनाथ सिंह यांनी एका सभेला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय नौदल आपले तेल टँकर होर्मुझ स्ट्रेटमधून सुरक्षितपणे बाहेर काढत आहेत. सैन्य पूर्णपणे सतर्क आहे. भारत मध्य पूर्वेतील युद्धाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. तिथे जी काही स्थिती बनेल त्याला तोंड देण्याची तयारी भारताने केली आहे. देशात पेट्रोल, डिझेल अथवा गॅसचा तुटवडा होणार नाही. भारतात कुठल्याही ऊर्जा संकटासाठी सज्ज आहे असं त्यांनी सांगितले.
PM मोदींच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक
राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची प्रशंसा केली आणि मोदींनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या कौशल्याने भारताच्या हिताचे रक्षण करत असल्याचे म्हटले. इराणने काही भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. भारतीय जनतेकडून इराणला मिळत असलेल्या पाठिंब्याचे इराणने कौतुकही केले आहे.
भारताच्या संरक्षण निर्यातीत वाढ
दरम्यान, एकेकाळी केवळ शस्त्र आयातीसाठी ओळखला जाणारा भारत आता निर्यातीच्या बाबतीत वेगाने प्रगती करत आहे. भारताची संरक्षण निर्यात जी २०१४ मध्ये अंदाजे ६०० कोटी रुपये होती, ती आता ३८,५०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २०२५-२६ मध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीत ६२.६६ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे अशीही माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
ड्रोन युद्धात भारत होणार 'सुपरपॉवर'
अलीकडेच राजनाथ सिंह यांनी मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षांदरम्यान ड्रोनच्या गरजेवर भाष्य केले. भारताने एक मजबूत ड्रोन उत्पादन परिसंस्था विकसित केली पाहिजे, येत्या काही वर्षांत आपल्याला ड्रोन उत्पादनाचे जागतिक केंद्र बनावे लागेल असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.