"ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली राजकीय होळी...", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:44 IST2025-05-29T16:33:38+5:302025-05-29T16:44:11+5:30
'ऑपरेशन सिंदूर' वरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

"ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली राजकीय होळी...", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर
"ऑपरेशन सिंदूर' हे नाव राजकीय आकर्षण मिळवण्यासाठी जाणूनबुजून देण्यात आले आहे. जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र येतात आणि देशाच्या हितासाठी परदेशात पोहोचतात तेव्हा केंद्र सरकार राजकीय होळी खेळत आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर केली. आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात आहोत, पण पंतप्रधान मोदी देशभरात सभा घेण्यात व्यस्त आहेत, असंही बॅनर्जी म्हणाल्या.
"पंतप्रधान जे बोलत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहे. जर विरोधी पक्ष परदेशात जात असेल तर ते देशाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आणि लोकशाहीचा आवाज उठवण्यासाठी जात आहेत, देशाची बदनामी करण्यासाठी नाही. हे ऑपरेशन बंगाल करण्याबाबत गोष्टी करत आहेत. मी त्यांना उघड आव्हान देते की जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्याच निवडणुकीची तारीख जाहीर करावी, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
उद्या निवडणुका घ्या, आम्ही तयार
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी बंगालच्या महिलांचा अपमान केला आहे. आम्ही सर्वांचा आदर करतो, पण आमच्या स्वाभिमानाच्या किंमतीवर नाही. त्यांना 'ऑपरेशन बंगाल' म्हणण्याची हिम्मत कशी होते? जर असे असेल तर उद्या निवडणुका जाहीर करा, आम्ही तयार आहोत.
ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत मध्य प्रदेश भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा मुद्दाही उपस्थित केला. त्या म्हणाल्या, "मध्य प्रदेशात जे घडले त्याची तुम्हाला लाज वाटत नाही का? जणू रस्त्यावर अश्लील व्हिडीओ वाजत आहेत."
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना लाईव्ह चर्चेचे आव्हान दिले
पंतप्रधान मोदींवर ऑपरेशन सिंदूर वरुन आरोप करत ममता बॅनर्जी यांनी सवाल उपस्थित केले. पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगार कुठे आहेत? त्यांना पकडले गेले का? नाही, पण तुम्ही बंगालची बदनामी करत आहात. आज जेव्हा आमच्या पक्षाचे खासदार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे रक्षण करत आहेत, तेव्हा पंतप्रधान आमच्या राज्याची बदनामी करण्यासाठी बंगालमध्ये येतात, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना थेट चर्चेसाठी आव्हान दिले आणि म्हणाल्या की जर तुमच्यात हिंमत असेल तर माझ्यासोबत लाईव्ह टीव्ही चर्चेत बसा. तुम्हाला हवे असेल तर टेलीप्रॉम्प्टर घेऊन या.