दिल्लीत राजकीय वातावरण तापलं! ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालहून का बोलावली 'स्पेशल फोर्स'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 09:27 IST2026-02-03T09:26:03+5:302026-02-03T09:27:22+5:30
रात्री उशिरा बंगालहून विशेष फोर्स दिल्लीत पोहचली. त्यामुळे आजचा मंगळवारचा दिवस दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत

दिल्लीत राजकीय वातावरण तापलं! ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालहून का बोलावली 'स्पेशल फोर्स'?
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा बंदोबस्तातही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाताहून स्पेशल फोर्स दिल्लीला बोलावले आहे. डिएसपी रँकचे अधिकारी, आरएएफच्या २२ जवानांची तुकडीसह बंगाल पोलिसांची एक विशेष पथक विमानाने दिल्लीला आले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना कोणती भीती सतावत आहे असा प्रश्न उभा राहिला आहे.
माहितीनुसार, संध्याकाळी ४ वाजता ममता बॅनर्जी यांच्याकडून टीएमसीच्या खासदारांसाठी चहापानाचं निमंत्रण देण्यात आले होते. त्याआधी दुपारी ३ वाजता ममता बॅनर्जी एसआयआर पीडितांसोबत पत्रकार परिषद घेण्यात येईल. ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगाच्या संघर्षाची ठिणगी आता दिल्लीपर्यंत पोहचली आहे. सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एसआयआर मुद्द्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबत बैठकीतून मध्येच बाहेर पडल्या. ममता यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. अधिकाऱ्यांनी अंहकारी वर्तणूक करून शिष्टमंडळाला अपमानित केले असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
त्यानंतर रात्री उशिरा बंगालहून विशेष फोर्स दिल्लीत पोहचली. त्यामुळे आजचा मंगळवारचा दिवस दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी यांची सुरक्षा आणि दिल्लीतील बंगाल सरकारच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी कोलकाताहून अतिरिक्त सुरक्षा दल दिल्ली मागवल्याचे बोलले जाते. दिल्ली येथील बंग भवन आणि पश्चिम बंगाल सरकारच्या इतर गेस्ट हाऊसची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. आयोग भाजपाची दलाली करतेय असा आरोप केल्याने राजकीय वातावरण गरम झाले आहे. दिल्लीतील संभाव्य विरोध प्रदर्शनामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत त्यांच्या सुरक्षेसाठी बंगालहून विशेष सुरक्षा दल बोलावले आहे.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
निवडणूक आयोगाच्या मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आयोगावर जोरदार हल्ला चढवला आणि आयोगाचे अधिकारी भाजपासाठी दलाल म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. इतके लोक मरण पावले आहेत, याला कोण जबाबदार आहे? आयोग जबाबदार आहे. ते भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.