'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 20:34 IST2025-06-02T20:31:21+5:302025-06-02T20:34:18+5:30

या शिष्टमंडळांनी जगातील अनेक देशांचा दौरा केला आणि ऑपरेशन सिंदूर, भारताची दहशतवादाविरोधात भूमिका आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला.

PM Narendra Modi to meet delegation that went on foreign tour after 'Operation Sindoor' | 'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार

'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार

नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ जगातील विविध देशात पाठवले होते. लवकरच हे शिष्टमंडळ पुन्हा भारतात परतणार आहे. त्यानंतर या सर्व शिष्टमंडळातील खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेतील. येत्या ९ किंवा १० जून रोजी मोदी शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळातील सदस्य खासदार परदेश दौऱ्यात आलेले अनुभव आणि तिथल्या बैठकांबाबत मोदींना माहिती देतील. 

या शिष्टमंडळांनी जगातील अनेक देशांचा दौरा केला आणि ऑपरेशन सिंदूर, भारताची दहशतवादाविरोधात भूमिका आणि पाकिस्तानचा खरा चेहरा  जगासमोर आणला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ७ शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर गेले आहेत. ज्यांचा मुख्य हेतू जागतिक पातळीवर भारताची भूमिका मांडणे हा आहे. या शिष्टमंडळांनी विविध देशातील अधिकारी, मंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यात भारताची भूमिका प्रभावीपणे त्यांच्यासमोर मांडली. या दौऱ्यात झालेला संवाद आणि भारताच्या प्रयत्नांना मिळालेल्या प्रतिसादाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली जाईल.

बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ भारतात परतल्यावर आधी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतील. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ ६ जून रोजी संध्याकाळी ७.३० वाजता जयशंकर यांना भेटेल. संजय झा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ ३ जूनला रात्री तर शिंदे यांचे शिष्टमंडळ दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीत येईल. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता. या हल्ल्यानंतर भारताने ६ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात १०० हून अधिक कुख्यात दहशतवादी मारले गेले. भारत कुठल्याही प्रकारचा दहशतवाद यापुढे सहन करणार नाही, त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल अशी कठोर भूमिका भारताने घेतली. भारताच्या दहशतविरोधी भूमिकेवर जगातील इतर देशांचे समर्थन मिळवणे आणि पाकिस्तानचा बुरखा फाडणे ही भारताची नीती होती. त्यासाठी भारताने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचे ७ शिष्टमंडळ जगातील विविध देशात पाठवले होते.

दरम्यान, या शिष्टमंडळांनी ३३ देशांचा दौरा केला. त्यात अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका, पूर्व आशियातील महत्त्वाच्या देशांचा समावेश होता. या प्रमुख शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अमेरिका, पनामा, गुयाना, ब्राझील, कोलंबिया या देशांचा दौरा केला. रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वात यूके, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्क आणि युरोपीय संघाचा दौरा करण्यात आला. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मध्य पूर्व आणि आफ्रिकातील काही देशांचा दौरा झाला. सुप्रिया सुळे, कनिमोझी करुणानिधी यांनीही विविध देशांचा दौरा केला.
 

Web Title: PM Narendra Modi to meet delegation that went on foreign tour after 'Operation Sindoor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.