भारत आता स्वतःच्या अटींवर करार करतो; 38 देशांशी झालेल्या ट्रेड डील्सवर पीएम मोदींचे भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 19:04 IST2026-02-15T19:02:42+5:302026-02-15T19:04:09+5:30
'राजकीय स्थैर्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला.'

भारत आता स्वतःच्या अटींवर करार करतो; 38 देशांशी झालेल्या ट्रेड डील्सवर पीएम मोदींचे भाष्य
नवी दिल्ली: अमेरिका आणि युरोपियन युनियनसोबत झालेल्या व्यापार करारांबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची आर्थिक दिशा, सुधारणा, खासगी क्षेत्राची भूमिका, संरक्षण क्षेत्र आणि डिजिटल एआय भविष्यावर सविस्तर भाष्य केले.
राजकीय स्थैर्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास
वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजकीय स्थैर्यामुळे भारतातगुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा वाढला आहे. मजबूत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, सेवा क्षेत्र आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) यांच्या बळावर भारत आज 38 देशांसोबत स्वतःच्या अटींवर व्यापार करार करण्यास सक्षम झाला आहे.
FTA मुळे एमएसएमईंना नवी बाजारपेठ
पीएम मोदी पुढे म्हणाले, भारताचे मुक्त व्यापार करार (FTA) हे विशेषतः टेक्सटाईल, लेदर, केमिकल्स, हस्तकला, दागिने आदी क्षेत्रांतील लघु व मध्यम उद्योगांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी करण्यात आले आहेत. यामुळे भारतीय उद्योगांची स्पर्धात्मकता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संरक्षण बजेट वाढीचे समर्थन
संरक्षण बजेटमध्ये झालेल्या वाढीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की, सध्याच्या जागतिक आणि प्रादेशिक परिस्थितीनुसार संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे सरकारचे कर्तव्य आहे. आमच्या सरकारने देशाच्या सशस्त्र दलांना बळकट करण्यासाठी आणि त्यांना सर्वतोपरी पाठबळ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत आणि पुढेही ते सुरू राहतील.
यूपीए सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका
पंतप्रधान मोदी यांनी यूपीए सरकारच्या आर्थिक कुप्रशासनावर तीव्र टीका केली. त्यांच्या मते, त्या काळात भारताला इतर देशांसोबत आत्मविश्वासाने ट्रेड डील्सवर चर्चा करता येत नव्हती. यूपीए काळात अनेकदा व्यापार करारांवर चर्चा सुरू व्हायची, पण त्या अर्ध्यावरच मोडीत निघायच्या. दीर्घ वाटाघाटीनंतरही ठोस निष्कर्ष लागत नव्हते, असे मोदींनी सांगितले.
रिफॉर्म्स ही एनडीएची ओळख
सुधारणा (Reforms) ही एनडीए सरकारची ठाम बांधिलकी आहे. एनडीए सरकारमध्ये ‘रिफॉर्म एक्सप्रेस’ वेगाने पुढे जात आहे. मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली असली, तरी मी स्वभावतः कधीच पूर्ण समाधानी नसतो. यावेळी पंतप्रधानांनी भारतातील पुढील आर्थिक परिवर्तनासाठी खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी उद्योगजगताला आवाहन करत म्हटले की, फक्त नफा वाचवण्यावर लक्ष केंद्रित न करता संशोधन व विकास (R&D), सप्लाय चेन आणि गुणवत्तेमध्ये आक्रमक गुंतवणूक करावी.
डेटा सेंटर्स, UPI आणि डिजिटल नेतृत्व
मोदी पुढे म्हणाले की, डेटा सेंटर्स हे भारतातील तरुणांसाठी रोजगाराचे मोठे स्रोत ठरणार आहेत. आम्ही संपूर्ण जगातील डेटा भारतात होस्ट करण्यासाठी खुले आमंत्रण देत आहोत, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, UPI मुळे व्यवहार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली असून भारत डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक नेता बनला आहे, असेही त्यांनी नमूद केले. भारत कंप्युटिंग क्षमतेचा विस्तार आणि डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करून एक समृद्ध एआय (AI) इकोसिस्टम उभारत आहे. यामुळे भविष्यातील तंत्रज्ञानाधारित अर्थव्यवस्थेसाठी भक्कम पाया तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.