२०२४ मध्ये पक्षाचा चेहरा कोण? ७५ वर्षांच्या जवळ पोहोचलेल्या मोदींनी जाहीर करावं; भाजपच्याच खासदाराची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 13:23 IST2021-06-29T12:45:44+5:302021-06-29T13:23:07+5:30
भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची मागणी

२०२४ मध्ये पक्षाचा चेहरा कोण? ७५ वर्षांच्या जवळ पोहोचलेल्या मोदींनी जाहीर करावं; भाजपच्याच खासदाराची मागणी
नवी दिल्ली: वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्यांनी कोणत्याही पदावर राहू नये असं म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा चेहरा कोण असेल ते सांगावं, अशी मागणी भाजपचेच खासदार असलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी केला आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींनी कोणत्याही पदावर राहू नये असं स्वत: मोदीच म्हणाले होते. त्यामुळेच त्यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि शांताकुमार यांच्यासारख्या नेत्यांना मुख्य प्रवाहापासून दूर केलं. त्यामुळे २०२४ मध्ये भाजपचा चेहरा कोण असणार, हे मोदींनीच सांगावं, असं स्वामी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करायला हवा. कार्यकर्त्यांना विचारात न घेतल्यास वाजपेयींसारखी परिस्थिती होईल. २०२४ च्या निवडणुकीतही भाजपची सरशी होईल आणि सत्ता कायम राहील, असंदेखील स्वामी यांनी म्हटलं. 'ईटीव्ही भारत'सोबतच्या एका संवादादरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी चीनसोबतचा संघर्ष, कोरोना स्थिती, त्याचा सर्वसामान्यांना बसलेला फटका, २०२४ ची निवडणूक यावर भाष्य केलं.
चीनसोबत आपलं सरकार बातचीत का करत आहेत तेच समजत नाही, असं स्वामी म्हणाले. 'ते आपल्या भूभागावर ठाण मांडून बसले आहेत आणि आपण संवाद साधत आहोत. त्यापेक्षा चीनसोबत युद्ध करायला हवं. भारत आणि आमची तुलनाच होऊ शकत नाही हे दाखवण्यासाठी चीनच्या कुरापती सुरू आहेत आणि त्यात ते यशस्वीदेखील झाले आहेत. चीननं जेव्हा घुसखोरी केली, तेव्हाच आपण जोरदार प्रत्युत्तर द्यायला हवं होतं,' असं स्वामी यांनी म्हटलं. चिनी सैनिक आपल्या भूमीत आलेच नाहीत, हे मोदींचं विधान खोटं होतं, असंही स्वामी म्हणाले.
आम्ही करून दाखवलं असं आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अगदी छातीठोकपणे सांगत होतो. याच अहंकारानं आपलं नुकसान झालं. कोरोना संकटाचा फटका प्रत्येक वर्गाला बसला. सर्वाधिक नुकसान गरिबांचं झालं. पहिली लाट गेल्यानंतर आपण ढोल बडवत राहिलो. दुसरी लाट येऊ शकतो याचा आपल्याला विसर पडला आणि आता तिसरी लाट येईल या भीतीखाली आपण वावरत आहोत, अशा शब्दांत स्वामींनी अप्रत्यक्षपणे सरकारच्या कोरोना व्यवस्थापनावर तोंडसुख घेतलं.