पंतप्रधान मोदींचा मोठा दावा ! पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण केले नसते तर...; नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:17 IST2026-03-28T14:15:37+5:302026-03-28T14:17:09+5:30
PM Modi Jewar Airport, E20 Speech: पंतप्रधान मोदींनी जेवर विमानतळाच्या उद्घाटनावेळी इथेनॉल मिश्रणाचे यश सांगितले. साडेचार कोटी बॅरल तेल आयात वाचली आणि शेतकऱ्यांना १.५ लाख कोटींचा फायदा झाला.

पंतप्रधान मोदींचा मोठा दावा ! पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण केले नसते तर...; नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन
जागतिक स्तरावर इराण-अमेरिका युद्धामुळे इंधन संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 'इथेनॉल ब्लेंडिंग' कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या धोरणामुळे भारताने केवळ परकीय चलनात मोठी बचत केली नाही, तर कच्च्या तेलावरील अवलंबित्वही कमी केले आहे. इथेनॉल निर्मितीमुळे भारताचे सुमारे १.५ लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. हे पैसे परदेशात गेले असते, पण इथेनॉलमुळे हा पैसा आपल्या देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे, असे मोदी म्हणाले.
देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचे, म्हणजेच नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. विशेषतः उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव केला. "तुमच्या शेतात पिकणाऱ्या उसापासून तयार झालेल्या इथेनॉलने देशाला मोठ्या संकटातून वाचवले आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ७,२०० एकर जागेवर विकसित केले जात आहे. चार टप्प्यांत काम पूर्ण झाल्यानंतर हे भारतातील सर्वात मोठे विमानतळ ठरेल. यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचेही पंतप्रधानांनी आभार मानले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे भारताने ४ कोटी बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाची आयात वाचवली आहे. जर हे मिश्रण झाले नसते, तर भारताला हे तेल महागड्या किमतीत बाहेरून विकत घ्यावे लागले असते. इथेनॉल प्रामुख्याने ऊस आणि धान्यापासून बनवले जाते. यामुळे तेल कंपन्यांकडून मिळणारा पैसा थेट देशातील शेतकऱ्यांच्या खिशात गेला आहे. गेल्या १० वर्षांत इथेनॉल पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये मिळाले आहेत.
भारत सध्या पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल (E20) मिसळण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून, जागतिक बाजारपेठेतील तेलाच्या वाढत्या किमतींचा भारतीय ग्राहकांवर होणारा परिणाम कमी झाला आहे. कच्च्या तेलाच्या तुलनेत इथेनॉल हे अधिक स्वच्छ इंधन आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनात घट झाली असून भारताच्या पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत मिळत आहे.सध्या मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका आहे. अशा वेळी भारताचे हे स्वदेशी इंधन धोरण देशाला मोठा आधार देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.