Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:13 IST2025-06-12T15:02:42+5:302025-06-12T15:13:58+5:30
Plane Crash: अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामुळे भारतात घडलेल्या मागील दुर्घटनांची आठवण ताजी झाली आहे.

Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद इथं नागरी वस्तीत एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ टीम पोहचल्या. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की जिथे विमान कोसळले तिथल्या इमारतींचेही मोठे नुकसान झाले. या विमानात २४२ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुर्घटनेत प्रचंड जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. अद्याप दुर्घटनेत किती मृत्यू झालेत याची अधिकृत माहिती समोर आली नाही.
देशातील ५ मोठे विमान अपघात
एअर इंडिया प्लेन क्रॅश (१९७८)
१ जानेवारी १९७८ साली मुंबईच्या अरबी समुद्रात एअर इंडियाचे बोइंग ७४७ फ्लाइट ८५५ विमान दुर्घटनाग्रस्त झाले. टेकऑफनंतर काहीच मिनिटांत ही दुर्घटना घडली. तांत्रिक बिघाड आणि पायलटच्या चुकीमुळे ही घटना घडली. यात विमानातील सर्व २१३ प्रवासी आणि पायलटचा मृत्यू झाला.
एअर इंडिया फ्लाइट, कनिष्क विमान दुर्घटना (१९८५)
२३ जून १९८५ साली आयरलँडच्या किनारपट्टीवर अटलांटिक महासागरात एअर इंडिया फ्लाइट १८२ बॉम्बस्फोटाने उडवण्यात आले. खलिस्तान समर्थकांनी केलेला हा दहशतवादी हल्ला होता. ज्यात ३२९ लोकांचा मृत्यू झाला ज्यातील बहुतांश भारतीय मूळ असलेले कॅनडियन नागरीक होते. हा हल्ला भारतातील सर्वात मोठा विमान हल्ला मानला जातो.
#WATCH | Debris at Air India plane crash site in Ahmedabad; Fire Services and other agencies present at the site pic.twitter.com/z9XsemwDnx
— ANI (@ANI) June 12, 2025
इंडियन एअरलाइन्स दुर्घटना (१९९०)
१४ फेब्रुवारी १९९० साली बंगळुरूच्या एअरबेस A320 विमान लँडिंगवेळी रनवेवर घसरून पुढे शेतात जाऊन कोसळले, त्यात मोठी आग लागली. तांत्रिक बिघाड आणि पायलटची चुकी यामुळे ही दुर्घटना घडली. या विमान अपघातात ९२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
एअर इंडिया एक्सप्रेस (२०१०)
२२ मे २०१० साली दुबईहून मंगळुरूला येणारं एअर इंडिया एक्सप्रेस बोइंग ७३७-८०० फ्लाइट लँडिंगवेळी रनवेवर घसरून दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत १५८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट (२०२०)
७ ऑगस्ट २०२० साली केरळच्या कोझिकोड एअरपोर्टवर दुबईहून परतणाऱ्या विमानाचा अपघात झाला. जोरदार पावसामुळे लँडिगवेळी हे विमान रनवेवरून घसरले आणि २ भागात तुटले. या अपघातात २१ जणांचा जीव गेला होता. वंदे भारत मिशन अंतर्गत ही फ्लाईट चालवली जात होती.