ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:20 IST2026-04-05T12:19:06+5:302026-04-05T12:20:59+5:30
Iran India Relations: इराणने भारतीय जहाजांसाठी होर्मुझचा मार्ग उघडा ठेवला असून ६ लाख बॅरल तेलाची खेप भारताकडे येत आहे. 'पिंग शुन' जहाजाबाबतच्या अफवांवर सरकारने काय स्पष्टीकरण दिले?

ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित
इराणकडून ७ वर्षांनंतर येणाऱ्या पहिल्या तेलवाहू जहाजाबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. हे जहाज चीनकडे वळल्याच्या आणि पेमेंटच्या अडचणीच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या, मात्र भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. ६ लाख बॅरल कच्चे तेल घेऊन 'पिंग शुन' हे जहाज भारताच्याच दिशेने येत असून ते लवकरच गुजरातच्या वडीनार बंदरात दाखल होईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून इराणचे ६ लाख बॅरल तेल घेऊन येणारे 'पिंग शुन' जहाज चीनकडे वळल्याच्या चर्चा होत्या. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने तांत्रिक बाबी स्पष्ट करत या अफवा खोडून काढल्या आहेत.
लॉजिस्टिक्सचा खेळ
जहाजाच्या 'बिल ऑफ लॅडिंग'मध्ये (पावती) अनेकदा डेस्टिनेशन बदलण्याची सोय असते. पिंग शुन हे जहाज ऑपरेशनल लवचिकतेसाठी चीनचे सिग्नल देत होते, मात्र त्याचे अंतिम लक्ष्य भारताचे वडीनार बंदर हेच आहे. भारताने इराणला पेमेंट करण्याबाबत विशेष व्यवस्था केली असून, त्यामुळेच ७ वर्षांनंतर हे तेल पुन्हा भारताच्या उंबरठ्यावर आले आहे. पिंग शुन जहाजाने सुरुवातीला चीनकडे जाण्याचे संकेत दिले होते आणि त्यानंतर अचानक गुजरातच्या वडीनार बंदराचे 'डेस्टिनेशन' दाखवले. मध्यंतरी पुन्हा दिशा बदलल्याच्या बातम्या आल्या होत्या. पिंग शुन या जहाजाने भारताला कधीच तेलपुरवठा केलेला नाही. आज पहिल्यांदाच ते भारताकडे येत आहे. ते ४ एप्रिलला येणार होते, परंतू अचानक ते चीनक़डे वळविण्यात आले. भारतात गजहब उडाल्यानंतर आता पुन्हा हे जहाज भारताकडे येत आहे.
३० दिवसांची सवलत: अमेरिकेने इराणवरील निर्बंध ३० दिवसांसाठी शिथिल केल्यामुळेच ही ६ लाख बॅरलची खेप भारताला मिळत आहे.
इराणकडून भारताला 'स्पेशल ट्रीटमेंट'
जगभरात इंधनाचा तुटवडा असताना इराणने भारताला मोठी सवलत दिली आहे. केवळ तेलच नव्हे, तर इराणने आपल्या नियंत्रणाखालील 'होर्मुझची सामुद्रधुनी' भारतीय जहाजांसाठी उघडी ठेवली आहे. युद्धाच्या काळात याच मार्गावरून भारताची 'ग्रीन सान्वी' सह ८ कार्गो जहाजे सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत.
LPG पुरवठा: यापूर्वी 'सी बर्ड' या जहाजाने मंगलोर बंदरात इराणकडून एलपीजीचा पुरवठा यशस्वीरित्या केला आहे.
भारतासाठी हे जहाज का महत्त्वाचे?
२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. जगाच्या २०% तेल-गॅस पुरवठा होणारा मार्ग (होर्मुझ) सध्या अंशतः बंद आहे. अशा स्थितीत इराणकडून थेट तेल मिळणे हे भारतासाठी ऊर्जा सुरक्षा आणि महागाई रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे.