बनावट दारुमुळे मृत्यू झाल्यावर आरोपीला फाशीची शिक्षा; शिवराज सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:59 IST2021-08-03T18:52:06+5:302021-08-03T18:59:20+5:30
Madhya Praesh: मध्य प्रदेश सरकारने बनावट किंवा विषारी दारू विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी केली आहे.

बनावट दारुमुळे मृत्यू झाल्यावर आरोपीला फाशीची शिक्षा; शिवराज सरकारचा मोठा निर्णय
भोपाळ: बनावट किंवा विषारी दारून बनवून विकणाऱ्यांना मध्य प्रदेश(Madhya Padesh) सरकारने मोठा झटका दिलाय. बनावट दारू विकून लोकांच्या आयुष्याचा खेळ करणाऱ्या गुन्हेगारांना आता मृत्यूदंडाची शिक्षा मिळणार आहे. मध्य प्रदेश सरकार लवकरच बनावट किंवा विषारी दारू विकणाऱ्यांना आजीवन कारावास किंवा मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करणार आहे.
शिवराज कॅबिनेटचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्या नेतृत्वात कॅबिनेटने हा मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, बनावट दारुमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर आरोपीस आजीवन कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. सध्या राज्यात या गुन्ह्यासाठी जास्तीत-जास्त दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
दंडाच्या रकमेत वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच मुख्यमंत्री विधानसभेत यासंबंधी एक विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकातून शिक्षेसह दंडाची रक्कम 10 लाख रुपयांवरुन वाढवून 20 लाख रुपये करण्यात येणार आहे. हे विधेयक मंजुर झाल्यानंतर बनावट दारू विकणाऱ्यांवर अशाप्रकारची कारवाई करणारे मध्य प्रदेश पहिलेच राज्य असेल.