तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:32 IST2025-07-16T15:31:37+5:302025-07-16T15:32:31+5:30
टाटा ग्रुपची Air India गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
Air India News: कल्पना करा की, तुम्ही विमानाचे तिकीट काढता आणि विमानतळावर वेळेत पोहोचता, पण तुम्हाला विमानात बसू दिले नाही. तुम्हाला सांगितले जाते की, विमानातील सर्व फुल्ल झाले आहे, त्यामुळे तुमच्यासाठी कारची व्यवस्था करण्यात आली आहे. अशावेळी तुमची काय अवस्था होईल..? गुजरातच्या भुज विमानतळावर एअर इंडियाच्या प्रवाशांची अशीच अवस्था झाली.
काय घडले?
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताच्या घटनेपासून एअर इंडिया कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत येत आहे. गेल्या शनिवारी भुज विमानतळावर एअर इंडियाच्या प्रवाशांना एका विचित्र समस्येचा सामना करावा लागला. प्रवाशांनी मुंबईला जाण्यासाठी तिकीट काढले, मात्र एअर इंडियाकडून त्या प्रवाशांसाठी कारने जाण्याची व्यवस्था करण्यात आली. टाईम्स ऑफ इंडिया (TOI) च्या बातमीनुसार, एअर इंडियाचे विमान AI609 शनिवारी सकाळी 8:55 वाजता भुजहून मुंबईला जाणार होते.
काही प्रवाशांनी चेक इन केले, बोर्डिंग पासही घेतले. परंतु 13 प्रवासी विमानात चढू शकले नाहीत. विमानात बसायला जागा नाही, असे या प्रवाशांना सांगण्यात आले. त्यातील बरेच प्रवासी कच्छ जिल्ह्यातील दुर्गम भागातून विमान पकडण्यासाठी आले होते. तांत्रिक कारणांमुळे एअर इंडियाने शेवटच्या क्षणी विमानात बदल केल्यामुळे ही समस्या उद्भवली होती. अशा परिस्थितीत, एअर इंडियाने त्या लोकांना कारने अहमदाबादला नेण्याची आणि नंतर त्यांना मुंबईला जाण्याची ऑफर दिली. काहींनी ऑफर स्वीकारली, तर काहींनी नाकारली. या गैरसोईबद्दल एअर इंडियाने दिलगीरी व्यक्त केली.