डाळीत मेलेला साप पाहताच भाविकांना उलट्यांचा त्रास! १२० जण रुग्णालयात; प्रसादामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:55 IST2026-03-20T17:41:48+5:302026-03-20T17:55:37+5:30
ओडिशात सापासोबत शिजलेली डाळ खाल्ल्याने अनेकांना उलट्यांचा त्रास सुरु झाला होता.

डाळीत मेलेला साप पाहताच भाविकांना उलट्यांचा त्रास! १२० जण रुग्णालयात; प्रसादामुळे खळबळ
Odisha Accident: ओडिशात एका धार्मिक कार्यक्रमात प्रसाद अनेकांच्या जीवावर उठल्याची घटना समोर आली आहे. ओडिशाच्या पट्टामुंडई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुआगाव गावात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान वाढण्यात आलेल्या दालमामध्ये चक्क मेलेला साप आढळला. हे समजताच प्रसादाचे जेवण करणाऱ्या भाविकांमध्ये एकच घबराट पसरली आणि लहान मुलांसह सुमारे १२० जणांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला.
नुआगाव येथील स्थानिक मंदिरात भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने गावकऱ्यांनी सुमारे ४०० लोकांसाठी भात आणि दालमा असा प्रसाद तयार केला होता. २०० हून अधिक लोकांनी जेवण केल्यानंतर, काही भाविकांना अन्नात मेलेला साप तरंगताना दिसला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जे लोक जेवत होते त्यांनी तातडीने ताटं सोडून दिली.
अन्नात उतरलं विष?
अन्न शिजवतानाच साप चुकून पातेल्यात पडला असावा आणि तो कोणाच्याही लक्षात आला नसावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. "जेवण वाढताना काही लोकांच्या नजरेस तो मेलेला साप पडला आणि एकच गोंधळ उडाला," असे स्थानिक रहिवासी विभूती दास यांनी सांगितले. ज्यांनी आधीच जेवण केले होते, त्यांना हा प्रकार समजताच भीतीपोटी उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागली.
आरोग्य विभागाची धावपळ
घटनेनंतर महिला आणि लहान मुलांसह अनेकांना तातडीने पट्टामुंडई उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती एक दिलासादायक माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. निराकार परिदा म्हणाले की, "तपासणीत अन्नातून विषबाधा झाल्याची स्पष्ट लक्षणे आढळली नाहीत. अन्नात साप होता हे समजल्यामुळे मानसिक धक्क्यातून अनेकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला असावा." सध्या सर्व बाधित लोकांची प्रकृती स्थिर आहे.
साप अन्नामध्ये शिजल्यास धोका किती?
'स्नेक हेल्पलाईन'च्या सुभेंदू मलिक यांनी सांगितले की, "साप जर चुकून अन्नात पडून शिजला गेला, तर अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. अशा अन्नाचे सेवन केल्यास मळमळ आणि उलट्यांसारखी लक्षणे दिसू शकतात. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर इजा झालेली नाही." खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी सकाळी गावात एक वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले असून सर्वांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जात आहे.