एलओसीखाली बोगद्यांचे जाळे विणण्याचा पाकचा कट; घुसखोरी वाढविण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:52 IST2025-05-30T10:52:29+5:302025-05-30T10:52:57+5:30
कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यास भारत सज्ज

एलओसीखाली बोगद्यांचे जाळे विणण्याचा पाकचा कट; घुसखोरी वाढविण्याची तयारी
नवी दिल्ली: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर 'मुळे अडचणीत आलेले पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी गट त्यांच्या कारवाया पुन्हा वाढवत असून, एलओसीखाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा कट आखत आहेत.
पाकिस्तानी सैन्याच्या थेट पाठिंब्याने बनवलेले हे अत्याधुनिक भूमिगत मार्ग दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी मदत करणारे ठरणार आहेत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षा संस्थांकडून आलेल्या अहवालानुसार, अलीकडेच नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कर अधिकारी आणि दहशतवादी संगनमताने काम करताना दिसून आले आहेत. हे अधिकारी पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबाच्या कमांडर्सलाही भेटताना दिसले. तसेच त्यांनी एलओसीवरही पाहणी केलेली आहे. सीमेवरून अतिरेक्यांची घुसखोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बोगद्यांचे जाळे विणण्याचा कट आखण्यात येत आहे, असेही अहवालात म्हटले आहे. भारताच्या सैन्याने २४हून अधिक अशा बोगद्यांचा पर्दाफाश केला आहे. या बोगद्यांचे मूळ पाकमध्ये आहे व ते हल्ल्यांशी जोडले गेलेले आहेत.
अशी आहे भारताची तयारी
या धोक्याचा सामना भारत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक पद्धतीनेही करीत आहे.
भेदक रडारने सुसज्ज असलेले ड्रोनचे थवे सीमेवर बारीक लक्ष ठेवतात आणि दडलेल्या संरचना शोधून काढतात.
भूकंपीय सेन्सर्स खोदकामातून होणाऱ्या कंपनांची नोंद ठेवतात. तर हाय रिझोल्युशन उपग्रह छायाचित्रे रिअल-टाइम पाळत ठेवतात.
मानवी बुद्धिमत्तेच्या साह्याने उन्नत टनेल रॅट बारकाईने मोहिमा पार पाडतात, तर बोगदाविरोधी यंत्रणा खंदकांच्या प्रवेशद्वारांना टिपते. पाकिस्तानने कितीही नकार दिला असला तरी, बोगद्यांवरच दहशतवाद्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचे स्पष्टपणे पुढे येते.
पुलवामा हल्ल्यासाठी...
२०१९मध्ये पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात भारताचे ४० सैनिक शहीद झाले होते. २०१६मध्ये नागरोटा येथील लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्यात चार पाकिस्तानी दहशतवादी सामील होते. हे सर्वजण या भूमिगत मार्गाचा वापर करून भारतात घुसलेले होते.
बहुतांश बोगदे जम्मूच्या सपाट भागात, नदी-खोऱ्यात
बहुतांश बोगदे जम्मूच्या सपाट भागात, नदी-खोऱ्याच्या भागात आहेत. तेथे मातीचे खोदकाम करण्यास सुलभ जाते. परंतु शोध घेण्यास अवघड जाते. हे काही सर्वसामान्य खोदकाम नाही. काही बोगदे ५०० मीटर लांबीचे व ३० मीटर खोलवर पसरलेले आहेत. त्यात प्रगत ऑक्सिजन पुरवठा प्रणाली आहे. तसेच मेड इन कराची वाळूच्या पिशव्यांनी मजबूत केलेले आहेत. भारताने केलेल्या तपासात बोगद्यांची दुसरी बाजू थेट पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांपर्यंत जात असल्याचे आढळले आहे.