शेपूट वाकडंच... काश्मीरची बदनामी करणाऱ्या 'त्या' रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 17:00 IST2018-07-10T16:59:50+5:302018-07-10T17:00:14+5:30
जम्मू-काश्मीरसंदर्भात संयुक्त राष्ट्रानं जारी केलेल्या एका अहवालावरून बराच वाद झाला होता. परंतु आता या अहवालाशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शेपूट वाकडंच... काश्मीरची बदनामी करणाऱ्या 'त्या' रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात !
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरसंदर्भात संयुक्त राष्ट्रानं जारी केलेल्या एका अहवालावरून बराच वाद झाला होता. परंतु आता या अहवालाशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅनडातील एक पाकिस्तानी व्यक्ती जफर बंगाश यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंगाश म्हणाले, ज्या व्यक्तीनं जम्मू-काश्मीरसंदर्भात अहवाल तयार केला तो पाकिस्तानच्या संपर्कात होता. त्यामुळे या अहवालाच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याची चर्चा आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, टोरँटोमध्ये असलेले जफर बंगाश हे पेशानं पत्रकार आहे आणि एका मशिदीत इमामही आहेत. काश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकारांचे उच्चायुक्त जायद बिन राड अल हुसेन अहवाल तयार करत असताना माझ्या संपर्कात होते. हा रिपोर्ट बनवण्यात आला त्यावेळी काश्मीरमधली काही माणसेही तिथे उपस्थित होती. त्यावेळी माझा पाकिस्तानमधल्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क झाला होता. तसेच संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकारांचे उच्चायुक्त आणि त्यांचे प्रतिनिधी पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले होते, तेव्हा त्यांचा सन्मान झाला. त्याचदरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती सरदार मसूद खानही उपस्थित होते. सरदार मसूद खान म्हणाले होते की, भारत-पाकिस्ताननं युद्धापासून बचाव केला पाहिजे, असंही जफर बंगाश यांनी सांगितलं आहे.
काय होतं संयुक्त राष्ट्राच्या अहवालात ?
संयुक्त राष्ट्रानं मानवाधिकार आयोगाचा अहवाल देत पाकिस्तानमध्येही दहशतवादविरोधी कायद्याच्या माध्यमातून सामान्यांना त्रास दिला जात असल्याचं अधोरेखित केलं होतं. काश्मीरमध्ये मानवाधिकारांच्या होत असलेल्या उल्लंघनावर योग्य तोडगा काढण्यावरही अहवालात जोर दिला होता. या अहवालात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वाणीला भारतीय सुरक्षा जवानांनी ठार केल्याचाही उल्लेख केला होता, ज्याला घाटीतून खूप विरोध झाला, असंही अहवालात म्हटलं होतं. तसेच काश्मीरमध्ये नागरिकांचं अपहरण, हत्या आणि हिसेंसारख्या प्रकारांच्या माध्यमातून मानवाधिकारांचं उल्लंघन सुरू असल्याचंही या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं होतं. या अहवालावर भारतीय अधिका-यांनी आक्षेप नोंदवला होता. जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरची कोणत्याही प्रकारे तुलना होऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाहीवर निवडून आलेलं सरकार आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणालाही मनमानी पद्धतीनं नियुक्त केलं जातं. अहवालात पाकव्याप्त काश्मीरचाही उल्लेख आहे. संयुक्त राष्ट्रानं कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशीची मागणी केली होती.