'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 19:59 IST2025-05-04T19:58:07+5:302025-05-04T19:59:56+5:30
Pahalgam Terror Attack: 'संरक्षण मंत्री म्हणून माझ्या सैनिकांसह देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही माझी जबाबदारी आहे.'

'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
Pahalgam Terror Attack: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिल्लीतील बकरवाला आनंदधाम आश्रमातील सनातन संस्कृती जागरण महोत्सवाला हजेरी लावली. या व्यासपीठावरुन संरक्षणमंत्र्यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल पाकिस्तानला थेट इशारा दिला आणि म्हटले की, संरक्षण मंत्री म्हणून माझ्या सैनिकांसह देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही माझी जबाबदारी आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात तुम्हाला जे हवे तेच होईल.
#WATCH | Delhi | While addressing the Sanskriti Jagran Mahotsav, Defence Minister Rajnath Singh says, "You all know Prime Minister Narendra Modi's work ethic and perseverance... You are aware of his efficiency & determination... You are aware of the way he has learnt to take… pic.twitter.com/uEHyf7Uea6
— ANI (@ANI) May 4, 2025
देशाविरोधात कारवाया करणाऱ्यांना योग्य उत्तर देणे, ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही सर्वजण आपल्या पंतप्रधानांना चांगले ओळखता, तुम्हाला त्यांच्या कामाच्या शैलीची माहिती आहे, त्यांच्या दृढनिश्चयाचीही चांगली जाणीव आहे. मी तुम्हाला खात्री देतो की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला जे हवे आहे, तेच होईल, असे सूचक विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल
राजनाथ सिंह पुढे म्हणतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पंतप्रधान मोदींनी 2047 पर्यंत संपूर्ण देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. स्वाभाविकच, हे ध्येय छोटे नाही, पण तुम्ही निश्चिंत राहा, हे ध्येय साध्य होईल. आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. पूर्वी, जेव्हा जेव्हा भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काही बोलायचा, तेव्हा जग भारताचे गांभीर्याने ऐकत नव्हते. भारत हा एक कमकुवत देश आहे, गरिबांचा देश आहे, असे म्हटले जायचे. पण, आज जेव्हा भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काही बोलतो तेव्हा संपूर्ण जग उघड्या कानांनी ऐकतो, असेही ते यावेळी म्हणाले.
पहलगाम प्रकरणातील नवीनतम अपडेट काय आहे?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीचा भाग म्हणून अनंतनागमध्ये 25 हून अधिक स्थानिक पर्यटक मार्गदर्शकांची चौकशी करण्यात आली आहे. स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हा हल्ला होऊ शकला नसता, असे तपास यंत्रणांचे मत आहे. तपास पुढे नेण्यासाठी एजन्सी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ओव्हरग्राउंड वर्करचा शोध घेत आहेत. हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, 'ज्यांनी हल्ला केला त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल'. त्याअंतर्गत लष्करी तयारी तीव्र करण्यात आली आहे.