...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:21 IST2025-06-01T19:19:38+5:302025-06-01T19:21:08+5:30
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरबाबत सीडीएस अनिल चौहान यांनी केलेलं विधान अतिशय गंभीर असून, त्यावर राजकीय चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानने भारताची काही विमानं पाडल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र भारतीय संरक्षण दले आणि सरकारकडून याला दुजोरा मिळत नव्हता. त्यावरून राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेतेही आक्रमक झाले होते. दरम्यान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी विमानांच्या झालेल्या नुकसानाबाबत सिंगापूरमध्ये केलेल्या विधानामुळे देशाच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत सीडीएस अनिल चौहान यांनी केलेलं विधान अतिशय गंभीर असून, त्यावर राजकीय चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी देशाबाहेर जाऊन माहिती देण्याआधी ही माहिती संरक्षण मंत्र्यांनी देशातून दिली पाहिजे होती, तसेच झालेल्या नुकसानीबाबत राजकीय पक्षांना सांगितले पाहिजे होते, असेही रमेश यांनी म्हटले आहे.
सिंगापूरमध्ये आयोजित शांग्री-ला डायलॉक सिक्युरिटी समिटमध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षावेळी भारताच्या लढाऊ विमानांचं नुकसान झाल्याचं मान्य केलं होतं. मात्र या कारवाईदरम्यान, किती विमानांचं नुकसान झालं, हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं. ते म्हणाले होते की, नुकसान किती झालं हे महत्त्वाचं नाही, पण काय चुका झाल्या, हे महत्त्वाचं आहे. तसेच किती नुकसान झालं याचे आकडे महत्त्वाचे नाहीत, तर त्यानंतर काय झालं हे महत्त्वाचं आहे, असेही सीडीएस चौहान म्हणाले होते.
लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सूरात सूर मिसळत जयराम रमेश यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत कारगिल रिव्ह्यू कमिटीप्रमाणे एक तज्ज्ञांची समिती तयार करून भारताच्या संरक्षविषयक तयारीची समीक्षा करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, आम्हाला जनरल चौहान यांच्या सिंगापूरमधून आलेल्या वक्तव्यांपर्यंत वाट का पाहावी लागली. जनरल चौहान यांनी जे मुद्दे मांडले ते महत्त्वाचे आहेत, तसेच ते केवळ लष्करी रणनीतीच नाही तर परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण आणि मुत्सद्देगिरीवरही परिणाम करणारे आहेत.