Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:26 IST2025-05-08T12:26:21+5:302025-05-08T12:26:53+5:30
Rajnath Singh on Ramcharitmanas Hanuman reference : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या यशस्वी लष्करी कारवाईचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे.

Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या यशस्वी लष्करी कारवाईचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या ऐतिहासिक यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रामचरितमानसमधील सुंदरकांडमधील एक महत्त्वाची चौपाई "जिन्ह मोही मारा, ते मैं मारे" चं उदाहरण देऊन धार्मिक पद्धतीने भारताचं धोरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
राजनाथ सिंह यांनी भारताच्या सैन्याच्या विचारसरणीचं वर्णन हनुमानाच्या धोरणासारखंच असल्याचं सांगितलं. "आम्ही फक्त त्यांनाच मारलं, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारलं. यावरून असं दिसून येतं की, भारताला कोणतंही युद्ध नको आहे, परंतु दहशतवाद्यांबद्दल झिरो टॉलेरेन्स पॉलिसी स्वीकारली आहे. भारतीय सैन्याने कोणत्याही पाकिस्तानी नागरिक किंवा लष्करी आस्थापनांना स्पर्श केला नाही. फक्त जैश, लष्कर आणि हिजबुलच्या दहशतवादी अड्ड्यांवरच हल्ला करण्यात आला" असं म्हटलं आहे.
"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
सुंदरकांडमधील चौपाईचा खरा अर्थ काय?
"जिन्ह मोहि मारा, ते मैं मारे. तेहि पर बांधेउं तनयं तुम्हारे॥
मोहि न कछु बांधे कइ लाजा. कीन्ह चहउं निज प्रभु कर काजा॥"
रावणाच्या दरबारात जेव्हा हनुमान प्रकट होतात तेव्हाचा हा श्लोक आहे. त्यांना विचारलं जातं की, त्यांनी रावणाचा मुलगा अक्षय कुमार आणि अनेक राक्षसांना का मारलं? तेव्हा यामागचं सत्य सांगत अगदी योग्य उत्तर देतात. ते म्हणतात की, मी फक्त त्यांनाच मारलं ज्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी कोणत्याही निष्पाप व्यक्तीला स्पर्श केलेला नाही.
"आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
ऑपरेशन सिंदूर आणि हनुमानजी
हनुमान यांचं हे धोरण कोणत्याही राष्ट्रासाठी राजनैतिक आदर्श बनू शकतं, जेव्हा कृती धर्मासाठी असते तेव्हा जबाबदारीने प्रतिसाद देणं हेच धोरण असतं. ऑपरेशन सिंदूर हे केवळ लष्करी ऑपरेशन नव्हतं. हा भारताचा संदेश होता की, आता आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही प्रतिसाद देऊ, पण न्यायाने.
"मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह याच्या वडिलांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्याने माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला आहे असं म्हटलं. वडील सय्यद हैदर शाह म्हणाले, "आज मला खूप आनंद झाला आहे कारण आपल्या सैन्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ लोकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. आज त्या सर्व आत्म्यांना शांती मिळेल हे मला समाधान आहे. ही कारवाई योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करण्यात आली आहे. हा न्यायाचा क्षण आहे."