भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:32 IST2025-05-16T10:32:22+5:302025-05-16T10:32:51+5:30
India-Pakistan ceasefire, Operation Sindoor: एकीकडे पाकिस्तानी ड्रोन एकामागोमाग एक पाडले जात होते, तर भारताची मिसाईल बिनदिक्कत लष्करी तळांवर आदळत होती. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये युद्धविरामाची चर्चा झाली होती.

भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार...
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट येत आहे. युद्धविरामाची मुदत येत्या १८ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. नवी दिल्ली आणि इस्लामाबादचे डीजीएमओ लवकरच चर्चा करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
दोन्ही देशांच्या डीजीएमओंच्या हॉटलाईनवरील चर्चेवेळी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती एनडीटीव्हीला सुत्रांनी दिली आहे. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये युद्धविरामाची चर्चा झाली होती. यानुसार सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी अतिदक्षता पातळी कमी करणे, पाकिस्तानी लष्कराकडून हल्ले थांबविणे आदींवर सहतमी बनली होती. यानंतर पुन्हा १२ मे रोजी चर्चा झाली. यावेळी सामंजस्य करारानुसार सैन्याची सतर्कतेची पातळी कमी करणे आणि दोन्ही देशांदरम्यान विश्वास निर्माण करण्याचे उपाय सुरु ठेवण्यावर चर्चा झाली होती.
भारत-पाकिस्तानमध्ये चार दिवस मिसाईल आणि ड्रोन हल्ले सुरु होते. भारताने पाकिस्तानचे दहशतवादी तळ तर उध्वस्त केलेच परंतू १३ पैकी ११ एअरबेसनाही नुकसान पोहोचविले होते. एकीकडे पाकिस्तानी ड्रोन एकामागोमाग एक पाडले जात होते, तर भारताची मिसाईल बिनदिक्कत लष्करी तळांवर आदळत होती. यामुळे नामोहरम झालेल्या पाकिस्तानने अखेर १० तारखेला दुपारी साडेतीन वाजता भारताला फोन फिरविला व हल्ले थांबविण्याची विनंती केली. भारताने ती मान्य करत यापुढे पाकव्याप्त काश्मीरवरच पाकिस्तानसोबत चर्चा होऊ शकते अशी अट ठेवली आहे.
भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या इस्लामाबादनेही आता शांती हवी असल्याचा जप करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच भारताने पाणी सोडण्याचीही इस्लाबादकडून विनंती करण्यात आली आहे. परंतू, भारताने ती फेटाळली आहे.