"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:58 IST2025-06-09T07:50:28+5:302025-06-09T07:58:55+5:30
पंतप्रधान मोदींशिवाय कोणीही ऑपरेशन सिंदूर राबवू शकले नसते, असंही चंद्राबाबू नायडू म्हणाले.

"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
N. Chandrababu Naidu on Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेश सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यासह भारताने दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानलाही कडक इशारा दिला. ऑपरेशन सिंदूरवर भारताची बाजू मांडत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जगभरातल्या देशांमध्ये जात पाकिस्तानची पोलखोल केली. त्यामुळे जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात आलं. आता एनडीएतील महत्त्वाचे घटक असलेल्या एन. चंद्राबाबू नायडू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींशिवाय कोणीही ऑपरेशन सिंदूर राबवू शकले नसते, असं टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं.
विरोधकांना नेहमीप्रमाणे आशा होती की कधीतरी चंद्राबाबू नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना विरोध करायला सुरुवात करतील. पण नेहमीप्रमाणे यावेळीही त्याच्या उलटच झाले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी सरकारच्या सर्व मुद्द्यांवर भाजप आणि पंतप्रधान मोदींना उघडपणे पाठिंबा दिला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदींचे उघडपणे कौतुक केले. मोदी सरकारसाठी ही एक मोठी कामगिरी आहे. इतर कोणताही नेता इतक्या अचूकतेने हे काम करू शकला नसता, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष रोखण्यात पंतप्रधान मोदींनी भूमिका बजावली, असंही चंद्राबाबू नायडूंनी म्हटलं.
"१०० टक्के, हे (ऑपरेशन सिंदूर) मोदी सरकारचे एक यश आहे. इतर कोणताही नेता इतक्या अचूकतेने आणि कार्यक्षमतेने हे करू शकला नसता. पहलगाम दहशतवादी हल्ला दुर्दैवी होता, ज्यामध्ये पतींना त्यांच्या पत्नींसमोर मारण्यात आले. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लष्करी कारवाईला "ऑपरेशन सिंदूर" असे नाव दिले, ज्यामध्ये भारतीय महिलांच्या भावनांचा आदर करण्यात आला. २० मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि नागरिकांवर आणि संरक्षणाच्या संदर्भातील ठिकाणांवर कोणताही हल्ला झाला नाही. वेळीच संघर्ष थांबवण्यात आला. पंतप्रधान मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी झाले. जर ते जास्त काळ चालू राहिले असते तर आपले नुकसान झाले असते," एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले.
"भारताला सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, पण आम्हाला कोणत्याही शिफारशी किंवा पाठिंब्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी जागतिक स्तरावर एक मोठे नेते म्हणून उदयास येत आहेत, जी भारतासाठी अभिमानाची बाब आहे," असंही चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं.