तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:43 IST2025-05-07T17:24:42+5:302025-05-07T17:43:16+5:30
अजित डोवाल यांनी विविध देशांतील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, भारताचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही.

तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले आहेत. या दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि जपानमधील त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली. त्यांनी रशिया आणि फ्रान्समधील अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे.
उत्तरासाठी भारत तयार : अजित डोवाल
अजित डोवाल यांनी विविध देशांतील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची आणि संघर्ष रोखण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली. अजित डोवाल यांनी म्हटले की, 'तणाव वाढवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. परंतु, जर पाकिस्तानने तसे करण्याचा निर्णय घेतला तर, भारत जोरदार प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.' भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल आणि 'नॉन-एस्कलेटेबल' उपाययोजनांबद्दल विविध देशांमधील त्यांच्या समकक्षांना माहिती देताना डोवाल यांनी हे विधान केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर, भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटांच्या बालेकिल्ल्यांचा समावेश आहे.
भारतासोबतचा तणाव संपवण्यास तयार : ख्वाजा आसिफ
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, भारताने आक्रमक भूमिका सोडली तरच हा तणाव संपू शकेल. त्यांच्या विधानानंतर, पाकिस्तानी लष्कराने शाहबाज शरीफ यांच्याकडे भारताच्या हवाई हल्ल्याचा बदला घेण्यासाठी परवानगी मागितली. यावर शाहबाज म्हणाले की, त्यांनी त्यांच्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.