काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:58 IST2025-07-02T16:55:56+5:302025-07-02T16:58:33+5:30
NIT Topper Lay Off: एनआयटीचा टॉपर म्हटल्यावर काय बघायला नको, कंपन्या त्याला कुठे ठेऊ कुठे नको करतात. या आयआयटी सारख्या संस्थांमध्ये गेली कित्येक वर्षे आपण ऐकतोय कोणाला १ कोटी पॅकेज दिले, कोणाला दोन कोटी वगैरे. पण या एनआयटी टॉपरला एका झटक्यात त्या कंपनीने काढून टाकले आहे.

काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
आजच्या काळात नोकरी मिळविणे जेवढे कठीण तेवढेच नोकरी गमविणे देखील कठीण झाले आहे. गमविणे कठीण अशा अर्थाने की ते दु:ख, पुन्हा नोकरी मिळविण्याची धडपड आदी गोष्टींपेक्षा समाजात होत असलेली सोशल चर्चा खूप वाईट असते. आजकाल एखाद्याच्या बाबतीत चांगले झाले तर ते कमी आणि वाईट झाले तर झटकन पसरते. यामुळे प्रत्येक गोष्टींचा सारासार विचार करूनच निर्णय घ्यायला हवेत. एखाद्याला चांगली ऑफर मिळाली म्हणून आपणही इर्शेला पेटू नये आणि एखादी मोठ्या पगाराची नोकरी मिळाली तरी जास्त हुरळूनही जाऊ नये. अशी शिकवण मिळणारा एक प्रसंग एनआयटीच्या टॉपरसोबत घडला आहे.
एनआयटीचा टॉपर म्हटल्यावर काय बघायला नको, कंपन्या त्याला कुठे ठेऊ कुठे नको करतात. या आयआयटी सारख्या संस्थांमध्ये गेली कित्येक वर्षे आपण ऐकतोय कोणाला १ कोटी पॅकेज दिले, कोणाला दोन कोटी वगैरे. पण या एनआयटी टॉपरला एका झटक्यात त्या कंपनीने काढून टाकले आहे. बंगळुरुमधील एका कंपनीने या विद्यार्थ्याला वर्षाला भरघोस ४३ लाखांच्या पगाराची नोकरी दिली. नोकरीवर जॉईन झाला, काही वर्षे गेली आणि कंपनीने कोणतीही नोटीस न देता नारळही दिला.
कंपनीने कामावरून एका झटक्यात काढून टाकले. याच्या बदल्यात त्याच्या हातावर तीन महिन्यांचा पगार टेकविण्यात आला. आता अनेकांना या कॉलेजमध्ये एवढी प्लेसमेंट मिळते, याला एवढा पगार दिला गेला असे ऐकायची सवय झालेली आहे. परंतू, थायरोकेअरचे संस्थापक डॉ. ए वेलुमणि यांनी अशांना सावध राहण्यास सांगितले आहे. सर्व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक धडा असल्याचे म्हटले आहे, जे काहीही कष्ट न करता मोठ्या पगाराच्या मागे धावत आहेत.
अनेक कंपन्या प्लेसमेंटच्या नावाखाली आकर्षक पगार दाखवून विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. परंतू हे सर्व कंपन्यांचे फायनान्शिअल रेकॉर्ड चमकविण्यासाठी असते. तुमच्या भविष्यासाठी नाही, असे ते म्हणाले आहेत. विद्यार्थी या जाळ्यात अडकतात, भरमसाठ पगार येऊ लागताच तो खरा वाटू लागतो आणि घर, गाडी, इतर गोष्टी खरेदी करतात, ईएमआय सुरु होतो आणि ते इतर जबाबदाऱ्यांतही अडकतात. नेमके तेव्हाच या कंपन्या त्यांना कोणतही दयामाया न दाखविता बाहेरचा रस्ता दाखवितात. मग अशावेळी या एकेकाळी टॉपर असलेल्या कर्मचाऱ्यांचा अचानक वाईट काळ सुरु होतो, असे वेलुमणि यांनी सांगत नव्या पिढीला सावध केले आहे.
आता या एनआयटी पासआऊटवर अशी वेळ आली आहे की थोडीफार बचत आणि कंपनीने भीक म्हणून दिलेले तीन महिन्यांचे पैसे यावर घर चालवावे लागत आहे. त्याच्या मुलाची शाळेची फीच १.९५ लाख रुपये आहे. या कर्मचाऱ्यानुसार त्याला अचानक कोणीतरी रस्त्यावर फेकल्यासारखे वाटत आहे. आता त्याला एकटे वाटत आहे, जे रोज पार्टी करणारे होते ते आता मदतही करत नाहीएत. पाहुण्यांमध्ये, मुलाच्या मित्रांच्या पालक वर्ग, सोसायटीमध्ये देखील लोक या व्यक्तीकडे लुझर या नजरेने पाहत आहेत.