‘चिल्ला-ए-कलां’ संपताच काश्मीरमध्ये रात्रीच्या तापमानात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 06:08 IST2026-01-31T06:07:50+5:302026-01-31T06:08:02+5:30
Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील कडाक्याच्या थंडीचा हंगाम ‘चिल्ला-ए-कलां’ शुक्रवारी संपला. दरम्यान, गुरुवारी रात्रीपासून राज्यात रात्रीच्या तापमानात वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे. श्रीनगरसह अनेक भागांत काही दिवसांत तापमान शून्याच्या खाली होते. शिवाय अनेक भागांत बर्फवृष्टी सुरू असल्याने थंडीचा कडाका वाढला होता.

‘चिल्ला-ए-कलां’ संपताच काश्मीरमध्ये रात्रीच्या तापमानात वाढ
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कडाक्याच्या थंडीचा हंगाम ‘चिल्ला-ए-कलां’ शुक्रवारी संपला. दरम्यान, गुरुवारी रात्रीपासून राज्यात रात्रीच्या तापमानात वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे. श्रीनगरसह अनेक भागांत काही दिवसांत तापमान शून्याच्या खाली होते. शिवाय अनेक भागांत बर्फवृष्टी सुरू असल्याने थंडीचा कडाका वाढला होता.
श्रीनगरमधील किमान तापमान १.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हे तापमान गुरुवारी रात्री शून्याच्या खाली होते. कोनिबलमध्ये १.० तर पुलवामामध्ये ०.१ अंश आणि कुलगाममध्ये १.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
२१ डिसेंबर ते ३० जानेवारी : चिल्ला-ए-कलां हा हंगाम २१ डिसेंबरपासून सुरू झाला होता. या काळात पर्वतीय भागांत जोरदार बर्फवृष्टी झाली. श्रीनगरसह पठारी प्रदेशांतही हलकी ते मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी झाली. यामुळे राज्यात थंडी प्रचंड वाढली होती. हा हंगाम शुक्रवार, ३० जानेवारी रोजी समाप्त झाला आहे.
महाराष्ट्र, गुजरातेत थंडीचा कडाका कमी होणार
पूर्व व पश्चिमेकडील भागांत ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली असून, महाराष्ट्र. गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांत चार दिवसांपासून थंडीचा कडाका कमी जाणवत आहे. येत्या आठवड्यांत या राज्यांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पंजाब-हरियाणासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीच्या भागात तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. पंजाब-हरियाणात किमान तापमान आता ८ ते १० अंशांपर्यंत वाढले आहे.