भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 07:29 IST2025-06-30T07:28:31+5:302025-06-30T07:29:02+5:30
भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लवकरच होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लवकरच होण्याची शक्यता आहे. ‘संघ परिवार’मधून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जागी येत्या काही आठवड्यांत नवीन अध्यक्षांची निवड लवकरच होऊ शकते.
संघ परिवारातील विविध घटकांमध्ये अध्यक्षपदाबाबत एकमत झाले असून, लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, २१ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
राज्य शाखांच्या मतदानाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच हे नाव उघड केले जाईल. नड्डा यांनी अध्यक्ष म्हणून त्यांचा विस्तारित कार्यकाळ संपल्यानंतर जवळजवळ एक वर्ष हे पद सांभाळले आहे.
भाजपच्या घटनेनुसार किमान अर्ध्या राज्यांमध्ये अध्यक्षांची निवड झाल्यावरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाऊ शकतात. १४ राज्यांमध्ये निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. आणखी सात ते नऊ राज्यांमध्ये पुढील १५ दिवसांत निवडणुका पूर्ण होतील. मागील आठवड्यात भाजपने महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पक्षप्रमुखांच्या निवडीसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. नव्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतर त्यांची कारकीर्द २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान यांच्या नावाचीही चर्चा
संभाव्य अध्यक्षपदासाठी तीन नावांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ऊर्जा व नगरविकासमंत्री मनोहरलाल खट्टर, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. या तिघांमध्ये शिवराजसिंह चौहान हे ज्येष्ठ आहेत.
भाजप नेतृत्वाने खट्टर यांच्या नावाचाही विचार केला. मात्र, सखोल चर्चा आणि विचारविनिमयानंतर तुलनेने तरुण असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबत असा विचार करण्यात आला की, संघटनेत इच्छित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ते चांगले ठरतील.
धर्मेंद्र प्रधान हे अध्यक्ष झाले, तर अध्यक्षपद भूषविणारे ते पूर्व भारतातील पहिले व्यक्ती ठरतील. त्यांचे वडील जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक होते आणि त्यांनी ओडिशा शाखेची स्थापना केली होती. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे नावही चर्चेत आले होते.