Pm Modi, Farmers in India: मोदी सरकारचं 'जय बळीराजा'! ३ लाखांच्या कर्जावर दीड टक्के व्याज सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 16:24 IST2022-08-17T16:23:46+5:302022-08-17T16:24:40+5:30
शेतकऱ्यांच्या क्रेडिट लाइन हमी योजनेच्या निधीतही वाढ

Pm Modi, Farmers in India: मोदी सरकारचं 'जय बळीराजा'! ३ लाखांच्या कर्जावर दीड टक्के व्याज सूट
Pm Modi, Farmers in India: मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. सरकार शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत आहे. त्यानुसार बैठकीत ३ लाख लाख रूपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर दीड टक्के सवलत मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या योजने अंतर्गत २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत ३४ हजार ८५६ कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याचेही त्याने सांगितले.
अनुराग ठाकूर याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात पुरेशी कर्जे मिळू शकणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासोबतच क्रेडिट लाइन हमी योजनेच्या निधीतही वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. सरकारच्या या पाऊलामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यापूर्वीच सांगितले होते की, सरकार कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्या दृष्टीने आज निर्णय घेण्यात आला.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) व्याख्यानांच्या मालिकेच्या समारोप कार्यक्रमात तोमर म्हणाले होते की, यामुळे केवळ रोजगाराच्या संधीच निर्माण होणार नाहीत तर शेतकर्यांनाही फायदा होईल आणि शाश्वत उपाय शोधून शेतकर्यांना समृद्ध करता येईल आणि शेतीचे आधुनिकीकरण करता येईल. केंद्राने कृषी क्षेत्राला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या असून राज्य सरकारांच्या सहकार्याने हे काम प्रगतीपथावर आहे, असेही ते म्हणाले.