"मम्मी मला माफ कर, लग्न करत असाल तर..."; पत्नीच्या छळानंतर पत्र लिहीत नितीनने संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:24 IST2025-01-22T15:20:46+5:302025-01-22T15:24:32+5:30
मध्य प्रदेशात तरुणीने पत्नी आणि तिच्या कुटुंबियांना कंटाळून आपला जीव दिल्याची घटना समोर आली आहे.

"मम्मी मला माफ कर, लग्न करत असाल तर..."; पत्नीच्या छळानंतर पत्र लिहीत नितीनने संपवलं आयुष्य
MP Crime: मध्य प्रदेशात बंगळुरूच्या अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणासारखीच घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोटही लिहिली ज्यामध्ये त्याने पत्नी, सासू, वहिनी आणि इतर नातेवाईकांवर अत्याचाराचा आरोप करत आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं. या चिठ्ठीत तरुणाने सरकारकडे कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे.
चिठ्ठीतून धक्कादायक आरोप
नितीन पडियार याने सोमवारी रात्री बाणगंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरी गळफास लावून घेतला. आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत त्याने अनेकांची नावे घेतली आणि छळाचा आरोप केला. नितीनचा पाच वर्षांपूर्वी हर्षा नावाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह झाला होता. त्याच्यातील वादामुळे हर्षा तिच्या आई-वडिलांच्या घरी राहत असून घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. नितीनच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, हर्षा देखभालीव्यतिरिक्त २० लाख रुपयांची मागणी करत होती. नितीनच्या मृत्यूनंतर सापडलेल्या चिठ्ठीतील आरोपांची चौकशी करण्यात येत असून तपासानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले.
मम्मी मला माफ करा
"मी, नितीन पडियार, भारत सरकारला देशाच्या कायद्यात बदल करण्याची विनंती करतो कारण स्त्रिया त्याचा गैरवापर करत आहेत. जर तुम्ही ही कायदेशीर व्यवस्था बदलली नाही, तर अनेक पुरुष आणि त्यांची कुटुंबे दररोज उद्ध्वस्त होत राहतील. मी भारतातील सर्व तरुणांना विनंती करतो की लग्न करू नका आणि जर त्यांनी केले तर कराराने लग्न करा. जर कोणाला आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटत असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याला न्याय द्या, अन्यथा तुमची पाळी येण्याची वाट पहा. मम्मी मला माफ कर, तू माझ्यासाठी जे केलेस त्याचे ऋण मी घेऊन जात आहे. मी गेल्यावर तू रडू नकोस आणि कोणाला रडू देऊ नकोस. तू रडशील तर मला वेदना होईल, मी पुढच्या जन्मी परत येईन आणि तुझे ऋण फेडेन," असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
पोलिसांनी ५० हजार रुपये मागितले
गेल्यावर्षी हर्षाने पती नितीन, मेव्हणा सूरज आणि सासू यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तडजोडीसाठी ती २० लाख रुपयांची मागणी करत होती. हुंड्याच्या छळाच्या एफआयआरमधून नाव काढण्यासाठी राजस्थान पोलिसांनी ५० हजार रुपये मागितले. लग्न झाल्यापासून तिच्याकडून हुंड्याची मागणी करण्यात येत होती असा आरोप हर्षाने केला होता.
वेगळा राहू लागलो तरी वाद
"लग्नानंतर पत्नी हर्षाचे आई, भाऊ आणि कुटुंबीयांशी अनेकदा वाद होत होते. मी त्याच्या विनंतीवरून कुटुंब सोडले तरीही विवाद होत होते. घरापासून विभक्त झाल्यावर एकटी राहिल्यावरही तिची भांडणे होऊ लागली. मुलगा झाल्यानंतर ती सासरच्या घरी गेली आणि परत आलीच नाही. माहेरचे घर सोडल्यानंतर ती वेगळ्या घरात राहण्याचा हट्ट करू लागली. वाद वाढला तेव्हा तिने हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. हुंडाबळी छळ प्रकरणाच्या बदल्यात तिने आमच्याकडून २० लाख रुपये मागितले. हर्षाला मी कर्जबाजारी असल्याची माहिती होती," असं नितीनने म्हटलं.
माझ्या कुटुंबाला पोलीस स्टेशन पाहायला लावलं
"हर्षा ६ महिन्यांची गरोदर असताना आम्ही डोहाळे जेवण ठेवलं होतं. हर्षाची आई न आल्याने आमचा भाचा अनिरुद्ध याने डोहाळे जेवण सोहळा पार पाडला. काही दिवसांनी मुलगा झाला. त्यानंतरही हर्षाची आई त्याला भेटायला आली नाही. हर्षाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले. मात्र त्यात नुकसान होते. यानंतर आणखी कर्ज घेतले, पण त्यातही तोटा झाला. हर्षाने भांडण केले आणि मोठी बहीण मीनाक्षीसोबत ४ मार्च २०२३ रोजी सकाळी सहा वाजता जोधपूरला ट्रेनने निघून गेली. काही महिन्यांनी मी तिला सांगितले की मला माझा मुलाची आठवण येत आहे. त्यावेळी हर्षाने एक अट घातली की कुटुंबापासून दूर राहिलास तरच मी परत येईल. तिने माझा नंबर ब्लॉक केला. दुसऱ्या नंबरवरुन फोन केला तर तिची आई फोन उचलायची आणि बोलू द्यायची नाही. वर्षभर हे असेच चालू राहिले. त्यानंतर मी वेगळे राहण्याचा विचार केला. परंतु २० लाख रुपये आवश्यक असल्याचे हर्षा आणि तिच्या आईने सांगितले. मी आधीच खूप कर्जात आहे. २० लाख रुपये कुठून द्यायचे? आम्ही राजस्थानला गेलो तेव्हा हर्षा आणि तिची आई म्हणाली की जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला या प्रकरणात अडकवू. यानंतर हर्षने आमच्याविरुद्ध न्यायालयात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मला, आई आणि भावाला धमकावले आणि खूप अपमान केला. माझ्या कुटुंबाने कधीही पोलीस ठाण्यात पाऊल ठेवले नाही. ते लोक खूप साधे आहेत. खोट्या खटल्यात त्याला न्यायालयात जावे लागते. माझ्या घरात माझा भाऊ एकमेव कमावता आहे. मी काम करण्यास असमर्थ आहे. असे असूनही, मला आणि माझ्या कुटुंबीयांना दर महिन्याला कोर्टाच्या तारखांसाठी राजस्थानला जावे लागते, असंही नितीनने पत्रात म्हटलं आहे.