Manoj Pal : जिद्द, चिकाटी, यश! ४० परीक्षांमध्ये नापास; १२ वर्षांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांचा लेक झाला अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:16 IST2026-03-04T15:16:09+5:302026-03-04T15:16:53+5:30
Manoj Pal : प्रत्येक अपयशाने एक नवा धडा शिकवला आणि अखेर १२ वर्षांनंतर स्वप्न साकार झालं.

Manoj Pal : जिद्द, चिकाटी, यश! ४० परीक्षांमध्ये नापास; १२ वर्षांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांचा लेक झाला अधिकारी
काहीतरी मोठं करण्याची जिद्द आणि अपार मेहनत असेल तर स्वप्नं नक्कीच पूर्ण होतात. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने हेच सिद्ध करून दाखवलं आहे. तब्बल ४० परीक्षांमध्ये अपयशाचा सामना करूनही जिद्द कायम ठेवली. मनोज पाल यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. सरकारी शाळेतील शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी हा संघर्ष सुरू ठेवला. प्रत्येक अपयशाने त्यांना एक नवा धडा शिकवला आणि अखेर १२ वर्षांनंतर त्यांचं स्वप्न साकार झालं.
एका मुलाखतीत मनोज पाल सांगतात की, त्यांचा प्रवास एका छोट्याशा गावातून सुरू झाला. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण सरकारी शाळेत झालं, जिथे सोयी-सुविधा नव्हत्या. बारावीच्या परीक्षेत त्यांना केवळ ५० टक्के गुण मिळाले होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सरकारी नोकरी मिळवून कुटुंबाला हातभार लावण्याचा त्यांनी निर्धार केला.
४० वेळा अपयश, पण जिद्द कायम
MPPSC (मध्य प्रदेश लोकसेवा आयोग) च्या तयारीसोबतच त्यांनी इतर स्पर्धा परीक्षांची तयारीही सुरू केली होती. सर्वप्रथम त्यांनी फॉरेस्ट गार्डसाठी अर्ज भरला, परीक्षा उत्तीर्ण केली, पण ते अपयशी ठरले. यानंतर त्यांनी MPPSC चे ६ प्रयत्न आणि इतर मिळून ४० परीक्षांमध्ये अपयश पाहिलं. अनेकदा पदरी निराशा आली, सोबतचे मित्र पुढे जात असल्याचं पाहून मन विचलित झालं, पण मनोज यांनी आपलं ध्येय सोडायचं नाही असा ठाम निश्चय केला होता.
आर्थिक चणचण आणि अभ्यासाची सांगड
आर्थिक आव्हानांशी लढताना मनोज यांनी आपली जिद्द नाही. इंदूरमध्ये राहून त्यांनी स्वतःचा खर्च भागवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवलं आणि कंटेंट रायटिंगचं कामही केलं. या कठीण काळामुळे ते मानसिकदृष्ट्या अधिक खंबीर झाले. "दुसऱ्यांना मदत करणं आणि सतत शिकत राहणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे" असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे.
१२ वर्षांची प्रतीक्षा संपली; मिळवला १५ वा रँक
परीक्षांची तयारी करता करता १२ वर्षे उलटली होती आणि अखेर तो दिवस उजाडला ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. MPPSC च्या ७ व्या प्रयत्नात त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. २०२४ च्या MPPSC परीक्षेत मनोज यांनी राज्यात १५ वा रँक पटकावला आणि मुलाखतही यशस्वीपणे पूर्ण केली. सध्या ते 'असिस्टंट डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत.