राहुल गांधींनी इंडिया आघाडीचं नेतृत्व सोडावं; मणिशंकर अय्यर यांचं वक्तव्य, दुसरं नावंही सुचवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:59 IST2026-02-23T12:57:53+5:302026-02-23T12:59:32+5:30
Mani Shankar Aiyar: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीय्या नेतृत्वाबद्दल केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राहुल गांधींनी इंडिया आघाडीचं नेतृत्व सोडावं; मणिशंकर अय्यर यांचं वक्तव्य, दुसरं नावंही सुचवलं!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. राहुल गांधींनी इंडिया आघाडीचे नेत्तृत्व सोडावे आणि ही जबाबदारी प्रादेशिक नेत्यांकडे सोपवावी, असा सल्ला अय्यर यांनी दिला आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना अय्यर यांनी स्पष्ट केले की, राहुल गांधींनी आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन, अखिलेश यादव किंवा तेजस्वी यादव यांच्यापैकी कोणाकडे तरी सोपवावे. "राहुल गांधींनी स्वतः नेतृत्व करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी छोट्या पक्षांतील नेत्यांना संधी द्यावी. जर दुसऱ्या कोणाकडे ही जबाबदारी असेल, तर त्यांना आघाडी मजबूत करण्यासाठी अधिक वेळ देता येईल," असे अय्यर म्हणाले.
अय्यर यांचे हे विधान अशा वेळी आले, जेव्हा इंडिया आघाडीत राहुल गांधींच्या नेतृत्वावरून मतभेद असल्याची चर्चा आहे. ममता बॅनर्जी सध्या आघाडीपासून अंतर राखून आहेत, तर अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्याकडूनही राहुल गांधींना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अय्यर यांनी प्रादेशिक नेत्यांना झुकते माप देण्याचे सुचवले आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या विधानानंतर काँग्रेस पक्षातूनच त्यांच्यावर टीका होत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या विधानामुळे बंगाल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस सरचिटणीस सुमन रॉय चौधरी यांनी अय्यर यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, "मणिशंकर अय्यर बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणातून आणि पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून दूर आहेत. त्यांचे विधान हे पक्षाचे अधिकृत मत नाही. ममता बॅनर्जी पडद्यामागून भाजपच्या बाहुल्या म्हणून काम करत आहेत, हे कदाचित अय्यर यांना माहित नसावे."
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अय्यर यांच्या विधानामुळे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून, आगामी काळात इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.