Maharashtra Politics: नवी तारीख! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर २७ सप्टेंबरला सुप्रीम सुनावणी; घटनापीठ निर्णय देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 20:38 IST2022-09-24T20:35:11+5:302022-09-24T20:38:33+5:30

सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणीत काय होणार? नेमका कुणाला दिलासा मिळणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

maharashtra political crisis shiv sena vs eknath shinde group petition will be hear on 27 september in supreme court | Maharashtra Politics: नवी तारीख! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर २७ सप्टेंबरला सुप्रीम सुनावणी; घटनापीठ निर्णय देणार

Maharashtra Politics: नवी तारीख! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर २७ सप्टेंबरला सुप्रीम सुनावणी; घटनापीठ निर्णय देणार

Maharashtra Politics:एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. यातच आता सर्वोच्च न्यायालयात केलेल्या विविध याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाच्या यादीत लागल्या आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी घेण्यात येणार आहे. 

मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी  सुरु आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती, पण सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले होते. त्यामुळे आता पुढील सुनावणीत निवडणूक आयोगाची कार्यवाही चालू ठेवायची की नाही, याबाबत सुरुवातीला फैसला अपेक्षित आहे. 

मागील सुनावणीत शिवसेनेला मिळाला होता दिलासा

यापूर्वी ७ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती. मात्र, केवळ १० मिनिटांच्या युक्तिवादानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्या सुनावणीत घटनापीठानं निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले होते. हा शिवसेनेसाठी मोठा दिलासा मानला गेला होता. शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी घटनापीठापुढे युक्तिवाद केला होता. तत्पूर्वी, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण असून, सर्वोच्च न्यायालयातही शिवसेनेच्या बाजूने फैसला होईल, असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  

दरम्यान, शिंदे गटाकडून गेल्या सुनावणीत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली होती. त्यावर अभिषेक मनू सिंघवी यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अगोदर निर्णय घेण्याची मागणी केली होती. दुसरीकडे, या पाच सदस्यीय खंडपीठात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या.हिमा कोहली, न्या. पी. नरसिंहा यांचा समावेश आहे. 

 

Web Title: maharashtra political crisis shiv sena vs eknath shinde group petition will be hear on 27 september in supreme court